सांगली : विटा येथील शासकीय निवासी शाळेतील ११ ते १५ वयोगटातील इयत्ता सहावी ते दहावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या २४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुरज प्रकाश जाधव ( वय १६ ), श्रवणकुमार विठ्ठल बागडे ( वय १७ ), सुरज किसन साठे ( वय १५ ), आदित्य आनंदा रोकडे ( वय १६ ), निर्मल किशोर सावंत (वय १४ ), स्मित सुभाष झिमरे ( वय १२ ), योगेश बिरुदेव मोटे ( वय १३ ), शुभम प्रकाश माळवे ( वय १४ ), हर्षवर्धन सुनील गायकवाड ( वय १३ ), तेजस सचिन काटे ( वय १५ ), आदित्य कैलास लोखंडे ( वय १६ ), आरूष संजय सकट ( वय १२ ), यश विजय सकट ( वय १२ ), श्रीवर्धन प्रवीण माने ( वय ११ ), प्रज्वल शशिकांत शिंदे ( वय १६ ), सिद्धार्थ जित्ताप्पा बनसोडे ( वय १३ ), आयुष नामदेव सावंत ( वय १३ ), तन्मय प्रकाश निकाळजे ( वय १४ ), सक्षम दिनकर सुखदेव ( वय १४ ), संदीप सुदर्शन नातपुते ( वय १४ ), प्रणव सुर्यकांत उबाळे ( वय १६ ), अभिषेक गौतम डोळसे ( वय १२ ), चैतन्य शशिकांत शिंदे ( वय १२ ), सक्षम तानाजी चंदनशिवे ( वय १२ ) अशी त्यांची नांवे आहेत.
विटा येथील साळशिंगे रस्त्यावरील आयटीआय कॉलेज शेजारी शासकीय निवासी शाळा आहे. विद्यार्थ्यांना खाण्यासाठी मासांहारी जेवण देण्यात आले होते. त्यानंतर दुपारी चार वाजता नाष्ट्यासाठी कलिंगड व दुध दिले होते. रात्री सात वाजता नेहमीप्रमाणे चपाती आमटीचे जेवण दिले. विद्यार्थ्यांना उलट्या व जुलाब सुरू झाल्याने आज सकाळी त्यांना विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आमदार सुहास बाबर यांनी शासकीय निवासी शाळेत डॉक्टरांची टीम पाठवून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना विट्यात बोलवून विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तातडीने त्याचा अहवाल देण्याच्या सूचना संबंधीत डॉक्टरांना दिल्या. शासकीय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित शाळेतून दिल्या जाणारे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचे पालक सांगत आहेत. विट्यातील शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. गरज भासल्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाईल. तशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.