मुंबई : राज्यातील शेतकरी कुटुंबांना लग्नसमारंभ आणि इतर शुभकार्यांसाठी सुरक्षित व परवडणारी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कुटुंबांना सवलतीच्या दरात राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यात वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकला झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सरनाईक यांनी ही माहिती दिली. अनेक शेतकरी कुटुंबे आर्थिक अडचणीमुळे लग्न किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमांसाठी ट्रक, डंपर किंवा अन्य अवैध वाहनांचा वापर करतात. अशा वाहनांमधून प्रवास करताना वारंवार गंभीर अपघात घडत असल्याने मानवी जीविताला मोठा धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकरी कुटुंबांसाठी विशेष सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बसचा ताफा महामंडळात दाखल झाल्यानंतर ज्या शेतकरी कुटुंबात मुलगा किंवा मुलीचे लग्न असेल आणि त्यांनी एसटी महामंडळाकडे बसची मागणी केली, तर शक्य तितक्या प्रमाणात ती बस त्यांच्या गावापर्यंत किंवा घराजवळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे परिवहनमंत्र्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कायदेशीर वाहतूक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
याचबरोबर राज्यातील अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करून त्यांच्या परवान्यांवर गदा आणली जाणार आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करण्याची कारवाईही करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात वाढती लोकसंख्या, रेल्वे, मेट्रो, एसटी आणि बेस्ट यांसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरील वाढता ताण यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य सरकारने ८ हजार ३०० नवीन एसटी बस खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या बस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होत आहेत. नवीन बस उपलब्ध झाल्यानंतर अनेक मार्गांवर प्रत्येक तासाला एसटी सेवा सुरू करण्यात येणार असून पुढील दोन ते तीन महिन्यांत काही महत्त्वाच्या मार्गांवर दर अर्ध्या तासाने बस धावतील, अशी माहितीही त्यांनी दिली. सुरक्षित आणि नियमित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. तसेच अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखणे, प्रवाशांच्या जीविताचे संरक्षण करणे आणि एसटी सेवेचा अधिकाधिक वापर वाढविणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचेही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.






