मुंबई : सरकारी खात्यात, पालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना मुंबईत वाढल्या आहे. नालासोपारा येथील एक महिला आणि तिच्या कथित पतीने गरीब कुटंबातील नऊ जणांना ४० लाखांना गंडा घातला. महापालिकेत अधिकारी असल्याचे भासविणाऱ्या या दोघांपैकी राकेश मिश्रा याला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली असून संबंधित महिला संध्या राठोड ही पोलिसांना चकवा देत आहे. करी रोड परिसरात एका खासगी कार्यालयात नोकरी करणाऱ्या तरुणाची ओळख नालासोपारा येथे वास्तव्यास असलेल्या संध्या राठोड या महिलेशी झाली. संध्या हिने शिक्षण विभागात निरीक्षक पदावर काम करीत असल्याचे सांगितले. महापालिकेत चांगल्या ओळखी असून अनेकांना नोकरी लावल्याचे तिने सांगितले. त्याचप्रमाणे पालिकेतील विभाग आणि वेगवेगळे पदे आणि त्यानुसार येणाऱ्या खर्चाचा तक्ताच तिने या तरुणापुढे ठेवला. संध्याची वागणूक संशयास्पद वाटल्याने सुरुवातीला या तरुणाने नकार दिला. मात्र काही दिवसांनी संध्याने या तरुणाला एका हॉटेलमध्ये बोलावले. या ठिकाणी अन्य काही महिला होत्या. या महिलांच्या नोकरीचे अर्ज संध्या भरत होती. हे पाहून तरुणाचा संध्यावर विश्वास बसला. त्यानंतर तो नोकरीसाठी पैसे द्यायला तयार झाला.
घनकचरा विभागात नोकरीसाठी साडेसात लाख रुपये खर्च येईल, असे संध्या हिने त्याला सांगितले. त्यानुसार टप्याटप्याने ती या तरुणाकडून पैसे घेत होती. सुरुवातीला तिने महापालिकेचा सही आणि शिक्का असलेले नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर एका लॅबमध्ये नेऊन वैद्यकीय तपासणी केली. याचदरम्यान तिने राकेश शर्मा या तरुणासोबत ओळख करून देत तो आपला पती असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ओळखपत्र घरी आणून दिले जाईल, असे सांगून तिने सर्व रक्कम घेतली. मात्र ओळखपत्र न मिळाल्याने या तरुणाने संध्या आणि राकेशला संपर्क केला. मात्र दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. अखेर त्याने आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. संध्या आणि राकेश टाळाटाळ करीत असल्याचे पाहून फसवणूक झालेल्या तरुणाने त्यांची अधिक माहिती काढली. या दोघांनी आठ जणांना फसविल्याचे समोर आले आहे. सर्वांची मिळून ४० लाखांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली होती. सर्व तरुण गरीब घरातील असून मेहनतीची रक्कम गेल्याने खचून गेले होते. त्यामुळे याची गंभीर दखल घेत आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेंद्र पाचे यांच्या पथकाने शर्मा याला अटक केली.