नवी मुंबई : आजचा दिवस केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नव्हे, तर भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पांमुळे देशाचा वेग आणि विकास अधोरेखित झाला आहे. पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी हे विकसित भारताच्या दिशेने टाकलेले मजबूत पाऊल असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, मुंबई मेट्रो लाईन-३ च्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे राष्ट्राला अर्पण, ‘मुंबई वन’या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचा शुभारंभ तसेच राज्यातील ४१९ आयटीआय आणि १४१ तांत्रिक संस्थांमध्ये २ हजार ५०६ बॅचेसच्या माध्यमातून नवीन अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जपानचे भारतातील राजदूत ओनू केईची, वन मंत्री गणेश नाईक, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, खासदार नरेश म्हस्के, खासदार धैर्यशील पाटील, आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, अमित साटम, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील, मंदाताई म्हात्रे, अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देश आणि राज्यासाठी महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे डिझाईन कमळाच्या आकारात असून ते भारतीय संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या विमानतळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, लघुउद्योग व निर्यातदार थेट युरोप, मध्यपूर्व यांच्यासह जागतिक बाजारपेठेशी जोडले जातील. त्याचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला होणार आहे. राज्यातील फळे, भाजीपाला व मासे निर्यातीला युरोप व इतर देशात नवीन बाजारपेठ मिळेल. यामुळे नवीन गुंतवणूक आणि उद्योग वाढेल. २०१४ मध्ये देशात केवळ ७४ विमानतळ होते. आज ही संख्या १६० च्या पुढे गेली आहे. उडान योजनेंतर्गत लाखो सामान्य नागरिकांनी प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे. भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक करणारा देश बनला आहे. विमान उत्पादक कंपन्यांकडे सध्या एक हजारहून अधिक नव्या विमानांच्या निर्मितीची मागणी आहे. त्यामुळे पायलट्स, इंजिनीअर्स, केबिन क्रू आणि देखभाल, दुरुस्ती व तपासणी (एमआरओ) सुविधांमुळे हजारो रोजगार संधी उपलब्ध होणार असून भारत हा ‘एमआरओ’ हब होणार आहे. त्याचबरोबर ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदरामुळे रोजगार वाढणार असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.







