मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव, सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यातही, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्थानिक विमान टर्मिनल परिसरातील तात्पुरत्या शेडमध्ये रिक्षा-टॅक्सी आणि ओला-उबर कॅब चालकांना नमाज पठण करण्याची परवानगी देऊ शकत नाही, अशी भूमिका राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात मांडली.
मानवतावादी दृष्टीकोनातून चालक आणि प्रवाशांना किमान रमजान महिन्यात नमाज पठण करण्यासाठी या परिसरातील एक जागा उपलब्ध करण्याचा विचार करा, असे आदेश न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला(एमएमआरडीए) दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी सरकारने उपरोक्त भूमिका मांडली. त्यावर, ही समस्या कायमची सोडवण्यासाठी आणि याचिकाकर्त्यांचे सदस्य नमाज अदा करू शकतील असे इतर कोणतेही क्षेत्र उपलब्ध करता येईल का ते पाहा, असे आदेश न्यायालयाने सरकार आणि एमएमआरडीएला दिले. फक्त रमजान दरम्यान त्यांना नमाज अदा करण्याची परवानगी दिली जाईल आणि रमजान संपल्यानंतर, तात्पुरती शेड पाडली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. याचिकेकडे प्रतिकूल दृष्टीने पाहू नका. सरकार म्हणून, सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी जागा शोधण्यास आम्ही तुम्हाला सांगत असून सुरक्षेशी तडजोड करायला सांगत नाही, असेही न्यायालयाने सुनावले.







