ठाणे : शहरातील शाळा, रुग्णालये, धार्मिक स्थळे आणि चित्रपटगृहांच्या परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत पानटपऱ्या, चिकन शॉप आणि चायनिज स्टॉलवर ठाणे महापालिका आता कठोर कारवाई करणार आहे. महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा जोरदार गाजल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने मंगळवारपासून विशेष अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्याची घोषणा केली. या मोहिमेची सुरुवात मुंब्रा परिसरातून करण्यात येणार असून, त्यानंतर संपूर्ण ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार आहे. सर्वसाधारण सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी शाळा, रुग्णालये आणि मंदिरांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या अनधिकृत टपऱ्यांमुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शाळांच्या परिसरातील काही पानटपऱ्यांमधून चॉकलेटच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी आणि युवकांना अमली पदार्थ पुरवले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच या टपऱ्यांभोवती सिगारेट आणि गुटखा सेवन करणाऱ्या तरुणांची वाढती गर्दी लहान मुलांवर नकारात्मक परिणाम करत असून, त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळण्याचा धोका वाढत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. रुग्णालये आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात फळे, फुले, नारळपाणी किंवा अन्य आवश्यक वस्तूंची दुकाने असावीत; मात्र त्या ठिकाणी वाढलेल्या चिकन शॉप, चायनिज स्टॉल आणि पानटपऱ्यांमुळे परिसराच्या स्वच्छतेसह शांत आणि पवित्र वातावरणालाही बाधा पोहोचत असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र पाठविल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नगरसेवक मनोज शिंदे यांनीही या मागणीला पाठिंबा देत काही अनधिकृत टपऱ्यांमधून अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप केला. अशा प्रकारांवर पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने महापालिकेने तातडीने पुढाकार घेऊन संबंधित टपऱ्या हटवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. सभागृहातील चर्चेला उत्तर देताना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शाळा, चित्रपटगृहे, रुग्णालये आणि सर्व धार्मिक स्थळांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याची घोषणा केली. ही मोहीम महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त समन्वयातून राबविली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या टपऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच “मुंब्रा आमच्यासाठी वेगळा नाही, संपूर्ण ठाणे शहरासाठी एकच निकष लागू असेल,” असे सांगत या मोहिमेची सुरुवात मुंब्र्यातून करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. महापालिकेच्या या निर्णयामुळे शाळा, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. मात्र, नगरसेवकांनी सभागृहात केलेले अमली पदार्थांच्या विक्रीसंदर्भातील आरोप हे त्यांचे आरोप असून, त्याबाबत संबंधित यंत्रणांकडून अधिकृत तपास आणि कारवाई होणे आवश्यक आहे.






