मुंबई : युद्धामुळे व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाल्याचा फटका पावनिर्मितीलाही बसणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनावर म्हणजेच एलपीजी गॅसवर परावर्तित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नव्याने रुपांतरित झालेल्या या बेकऱ्या आता संकटात सापडल्या आहेत. जुन्या भट्ट्याही तोडून टाकल्यामुळे येत्या एक दोन दिवसात पावही मिळणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे वडापाव, बनमस्का हे पदार्थ देखील मुंबईकरांना मिळणे अवघड होणार आहे.
लाकूड व कोळसा यांचा इंधन म्हणून उपयोग करणा-या भट्टी (बेकरी), हॉटेल्स्, उपाहारगृहे वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात सर्व बेकऱ्यांना स्वच्छ इंधनावर परावर्तित करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई महापालिका करीत आहे. मुंबई महापालिकेने या सर्व बेकऱ्यांना स्वच्छ इंधनावर रुपांतरित करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे आतापर्यंत जवळपास ८० ते ९० टक्के बेकऱ्या या स्वच्छ इंधनावर विशेषतः एलपीजी गॅसवर परावर्तित झाल्या आहेत. विजेवरील ओव्हनपेक्षा बहुतांशी बेकऱ्या या एलपीजी सिलेंडरवर चालतात. मात्र आखातातील युद्धामुळे देशात, राज्यात व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बेकरी उद्योगालाही या युद्धाची झळ बसणार आहे. मुंबई बेकर्स असोसिएशनचे मोहम्मद फारूख शाह यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बहुतांशी बेकरी या स्वच्छ इंधनावर परावर्तित झाल्या आहेत. जुन्या भट्टी तोडून टाकण्यात आल्या आहेत. त्यातच आता सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्यामुळे बेकरी बंद ठेवण्यापलिकडे आम्हाला आता पर्याय नाही. त्यामुळे येत्या एकदोन दिवसात पावाचीही टंचाई मुंबईत दिसेल. भट्टीवरील बेकरी होत्या तेव्हा जळणासाठी लाकूड, पुठ्ठा काहीही टाकून भट्टी पेटवता येत होती. आता तो पर्यायच उरला नाही. त्यातच स्वच्छ इंधन वापरण्यासाठी मुंबई महापालिकेने नोटीसा बजावल्या असतील तर पाव निर्मितीला दुहेरी फटका बसणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
या परिस्थितीचे महत्त्वाचे पैलू:
- गॅसची टंचाई :इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि ‘स्ट्रैट ऑफ होर्मुज’ (Strait of Hormuz) येथील पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे भारतात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.
- हॉटेल बंद होण्याची भीती :मुंबईतील हॉटेल असोसिएशनने (AHAR) इशारा दिला आहे की, गॅसचा पुरवठा न सुधारल्यास येत्या काही दिवसांत सुमारे ५०% हॉटेल्स आणि वडापाव गाड्या बंद होऊ शकतात.
- पाव मिळणे कठीण :कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्या आता स्वच्छ इंधनावर (LPG) अवलंबून आहेत. गॅस नसल्यामुळे पावाचे उत्पादन घटले आहे, ज्यामुळे वडापावसाठी लागणारा पाव मिळणे मुश्कील झाले आहे.
- मेन्यूमध्ये कपात :अनेक स्टॉल्स आणि हॉटेल्सनी गॅसची बचत करण्यासाठी कामाचे तास कमी केले आहेत किंवा मेन्यूमधून काही पदार्थ तात्पुरते वगळले आहेत.
- खाद्यतेलाची दरवाढ :रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे सूर्यफूल व अन्य खाद्यतेलाच्या आयातीवर परिणाम होऊन त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत.







