मुंबई : इराण युध्दामुळे तेल व वायू आयातीवर मोठा परिणाम झाल्याने केंद्र सरकारने एकदम व्यावसायिक सिलिंडरचे उत्पादन बंद करण्याचा आदेश दिला. फक्त घरगुती गॅसचे उत्पादन सुरू राहणार आहे. व्यावसायिक गॅसचे उत्पादन बंद केल्याने आजपासूनच रेस्टॉरंट, खानावळी, हॉटेल यांना सिलिंडर मिळणे जवळजवळ बंद झाले आहे. परिणामी आताच २० टक्के हॉटेल बंद झाली आहेत. येत्या दोन दिवसांत आहेत ते सिलिंडर संपले की सर्वच हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी बंद होणार आहेत. मालकांनी आजच ही सूचना दिली आहे. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल तणाव दहा दिवस उलटूनही संपत नसल्याने त्याचा तीव्र फटका राज्यातील गॅस पुरवठ्याला बसून अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. घरगुती स्वयपांकाच्या (एलपीजी) गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली असून, आज राज्यातील अनेक शहरांत सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेतच, पण व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्याचा आदेश केंद्र सरकारने काढल्याने हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसाय दोन दिवसात बंद पडणार आहे.
गॅसटंचाईमुळे मुंबईमध्ये सुमारे २० टक्के हॉटेल बंद ठेवण्याची आताच वेळ आली असून, आणखी दोन दिवसांत ५० टक्क्यांहून अधिक हॉटेल, रेस्टॉरंट बंद पडतील, अशी स्थिती आहे. गॅस टंचाईमुळे मंदिरांतील अन्नछत्रे, शाळांमधील स्वयंपाक व्यवस्था, खानावळी बंद होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या ‘आहार’ संघटनेने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. केंद्राने आम्हाला आधी अंदाज दिला असता तर आम्ही थोडीतरी सिलिंडरची सोय केली असती, अशी व्यावसायिकांची तक्रार आहे. गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आणि पुरवठा नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 लागू केला आहे. सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक सेवांना एलपीजी उपलब्ध करून दिला जाणार आहे. गॅस बुकिंगच्या नियमात आज पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून आता २१ दिवसांऐवजी २५ दिवसांनंतरच गॅस बुकिंग करता येणार आहे. स्वयंपाक गॅस पुरवठा सुरळीत राहावा यासाठी केंद्राने तीन पुरवठादार कंपन्यांची समिती नेमली असून, ही समिती पुरवठ्यावर लक्ष ठेवणार आहे. तरीही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस सिलिंडर तुटवडा जाणवत आहे. सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध आणल्याने राज्यातील हॉटेल उद्योग ‘गॅस’वरच आला आहे. मुंबईमधील सुमारे २० टक्के हॉटेल बंद करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. परिस्थिती अशीच कायम राहिली तर येत्या दोन दिवसांत ५० टक्क्यांहून अधिक हॉटेल बंद पडण्याची शक्यता आहे. हॉटेल व रेस्टॉरंट उद्योग संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर म्हणाले की, मंत्रालयाकडून ५ मार्चला आम्हाला सूचना आली होती. तेव्हापासून एलपीजी सिलिंडरचा पुरवठा कमी होत गेला. या गॅसटंचाईमुळे सध्या मुंबईतील सुमारे २० टक्के हॉटेल बंद पडली आहेत. हीच परिस्थिती राहिली तर येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात हॉटेल बंद पडण्याची शक्यता आहे. बाजारात एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार सुरू झाल्याच्याही तक्रारी आहेत. १,८४० रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर सध्या काळ्या बाजारात तब्बल ३,००० रुपयांपर्यंत विकला जात आहे. एवढ्या वाढीव दराने सिलिंडर खरेदी करून व्यवसाय चालवणे शक्य नाही. आम्ही आज छगन भुजबळ यांची भेट घेऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. भुजबळ यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.







