मुंबई : वांद्रे पूर्व ते जोगेश्वरी पूर्वदरम्यानच्या परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या कालावधीत काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असून, काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. के दक्षिण आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी २४०० मिलीमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे अंधेरी-जोगेश्वरी पूर्वदरम्यानच्या के दक्षिण विभागातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपूरा, देऊळवाडी, मासळी बाजार, घाटीवाडा, चकाला, पी. ॲण्ड टी. वसाहत, कोलडोंगरी, ओल्ड पोलीस लेन, विजय नगर आणि मोगरापाडा या भागांचा त्यात समावेश आहे. पी. ॲण्ड टी. वसाहतीत दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मोगरापाडा येथे सायंकाळी ५ ते रात्री १० या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. बुधवार, १२ ऑगस्ट रोजी सहार गाव, सुतार पाखडी आणि कार्गो संकुल या भागात सकाळी ५ ते ८ या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी या कालावधीचा विचार करून पाण्याची योग्य व्यवस्था करून ठेवणे आवश्यक आहे.
दरम्यान, एच पूर्व विभागातील काही महत्त्वाच्या भागांचा पाणीपुरवठा या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहे. मंगळवार, ११ ऑगस्ट ते बुधवार, १२ ऑगस्ट या कालावधीत देशांतर्गत विमानतळ, हँगर कर्मचारी वसाहत, एअर इंडिया वसाहत, सांताक्रूझ पूर्व, वांद्रे रेल्वे टर्मिनस आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील वांद्रे पूर्व परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवार, १२ ऑगस्ट रोजी संपूर्ण एच पूर्व विभागासह सांताक्रूझ पूर्व, खार पूर्व आणि वांद्रे पूर्व भागातील पाणीपुरवठाही पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा खंडित होण्यापूर्वी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि महापालिकेच्या कामाला सहकार्य करावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून आणि गाळून पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि सुधारणा कामामुळे तात्पुरता पाणीपुरवठा खंडित होणार असला तरी, या उपाययोजनांमुळे संबंधित विभागातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम आणि सुधारित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियोजित पाणीबंद लक्षात घेऊन आवश्यक ती पूर्वतयारी करावी आणि महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






