मुंबई : मुंबईतील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पसरणारी अस्वच्छता रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुन्हा क्लीन मार्शल नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सार्वजनिक ठिकाणी कचरा, डेब्रिज टाकण्यास मनाई आहे. मात्र नागरिकांकडून सातत्याने याचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने मुंबईच्या रस्त्यांवर क्लीनअप मार्शल पुन्हा नेमण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात आला आहे. येत्या १० दिवसांत पालिकेकडून याची अंमलबजावणी देखील होणार आहे. त्यामुळे आता रस्त्यावर थुंकण्याआधी, कचरा फेकण्याआधी नागरिकांनी १० वेळा विचार करावा. नाहीतर नियम मोडल्यामुळे दंड भरावा लागणार आहे. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात तैनात करण्यात येणारे क्लीनपअ मार्शन हे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणे, नैसर्गिक विधी करणे, कचरा-अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करुन दंड वसूल करणार आहेत. यामध्ये अस्वच्छता पसरणवणाऱ्यांवर २०० रुपयांपासून १ हजारांपर्यंतच्या दंडाची कारवाई होऊ शकते. दोन वर्षांपूर्वी क्लीनअप मार्शल पुरवणाऱ्या संस्थेच्या कंत्राटाची मुदत संपल्याने ती मोहिम रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सध्या शहरात क्लीनअप मार्शल तैनात नाहीत. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे मुंबईत स्वच्छता दूत नेमण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. स्वच्छतेसंदर्भात व्यापक मोहीम राबवण्यासाठी स्वच्छता दूत नेमण्यात आले आहेत. त्यानुसार स्वच्छतेबाबत जनजागृती, प्रशासनाला माहिती देऊन स्वच्छतेचे काम करणे, सोसायट्यांमध्ये करच्याचे वर्गीकरणावर नजर ठेवणे अशी कामे केली जाणार आहेत. तर दुसरीकडे क्लीनअप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये आकारलेल्या दंडाची अर्धी रक्कम संबंधित कंत्राटदाराला तर अर्धी रक्कम पालिकेच्या खात्यात जाणार आहे. त्यामुळे अच्छता पसरणवणाऱ्यांवर कारवाई देखील होणार आहे तसेच महापालिकेच्या तिजोरीत महसूलही जमा होणार आहे.
क्लीनअप मार्शल आणि वाद यांचे नाते खूप जुने आहे. मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचे संकट सुरू झालं होते. त्यानंतर २० एप्रिल २०२० पासून मुंबईत मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले. मास्क नसलेल्यांवर कारवाई करताना क्लीनअप मार्शल अनेकदा वादात सापडले होते. अनेक वेळा मार्शलवर लोकांकडून पैसे उकळणे, मारहाण करणे आणि जादा शुल्क आकारणे असे आरोप करण्यात आले होते. मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विनाकारण लोकांवर कारवाई न करण्याचे आदेश क्लीन अप मार्शलना दिले होते. तसेच क्लीनअप मार्शलच्या विरोधात तक्रारी येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. २० एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ पर्यंत मास्क नसलेल्यांवर क्लीनअप मार्शलने कारवाई करण्यात येत होती. मास्क नसलेल्यांना २०० रुपये दंड ठोठावण्यात येत होता. मात्र आता हा वाद टाळण्यासाठी दंड घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे.





