मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने डिसेंबर महिन्यात विक्रमी ४८.८० लाख प्रवासीसंख्या हाताळली. एका महिन्यात या विमानतळावरून इतक्या प्रवाशांनी ये-जा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याखेरीज करोनापूर्व काळातील ११२ टक्के प्रवासी पुन्हा विमानतळाकडे परतल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे. करोनापूर्व काळात मुंबईचे विमानतळ देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यग्र विमानतळ होते. डिसेंबर २०१८मध्ये यावरून २४ तासांत एक हजार सात इतक्या सर्वाधिक विमानांची ये-जा झाली होती. हवाई वाहतूक क्षेत्रात मे व डिसेंबर, हे महिने सर्वाधिक प्रवासीसंख्येचे असतात. यंदा मुंबईच्या विमानतळाने डिसेंबर २०२३ मध्ये मासिक प्रवासीसंख्येचा विक्रम केल्याने डिसेंबरची तुलना केल्यास करोनापूर्व काळात डिसेंबर २०१९ मध्ये ४३.७० लाख प्रवाशांनी ये-जा केली, तर डिसेंबर २०२२मध्ये हा आकडा ४३.३० लाख होता. तो यंदा मोडीत निघाला.
डिसेंबर महिन्यात एकूण आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी आखाती देशांकडे जाणारे ४७ टक्के, आशिया-पॅसिफिककडे जाणारे २८ टक्के व युरोपकडे जाणारे १५ टक्के प्रवासी होते. देशांतर्गत दिल्ली, बेंगळुरू व गोवा हे अग्रणी तीन विमानतळांपैकी होते. मुंबई-दिल्लीदरम्यानच तब्बल सहा लाख २२ हजार ४२४ प्रवाशांनी ये-जा केली. १६ डिसेंबर २०२३ला सर्वाधिक एक लाख ६५ हजार २५८ प्रवाशांनी ये-जा केली. त्यामध्ये ८४ हजार १६६ आगमन झालेले व ८१ हजार ०९२ हे जाणारे प्रवासी होते, अशी माहिती हे विमानतळ चालविणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (मिआल) दिली.





