मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईअंतर्गत मंगळवारी दक्षिण मुंबईतील तीन नामांकित हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ रद्द करण्यात आले. याशिवाय अमरावतीतील एका हॉटेलविरुद्धही कठोर कारवाई करत व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. भेंडी बाजार परिसरातील ‘शालिमार हॉस्पिटॅलिटी’ या हॉटेलमध्ये स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि व्यवस्थापनासंदर्भातील अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्यामुळे काही दिवसांपूर्वी सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही सुधारणा न झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांना येथे स्वच्छतेसह एकूण २५ गंभीर त्रुटी आढळून आल्याने हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला. याच परिसरातील ‘नूर मोहम्मदी’ हॉटेलमध्ये स्वयंपाकघरात काळ्या तेलाचे जाड थर, उघड्या खिडक्यांमुळे कीटकांचा मुक्त प्रवेश, भिंती व छतांवरील निघालेला रंग, अस्वच्छ पद्धतीने कच्च्या मालाची साठवण, पुरवठादारांच्या नोंदींचा अभाव, जुनी व अस्वच्छ भांडी, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदी नसणे तसेच कीटक नियंत्रणासाठी आवश्यक ड्रेनेज व्यवस्था नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या हॉटेलचाही परवाना तात्काळ रद्द करण्यात आला. उमरखाडी परिसरातील ‘रहमानिया रेस्टॉरंट’मध्येही अन्नपदार्थ, रसायने आणि पॅकेजिंग साहित्याच्या साठवणुकीतील त्रुटी, कीटकप्रतिबंधक नसलेले दरवाजे, गंजलेली व निकृष्ट दर्जाची स्वयंपाकाची उपकरणे, भिंती व छतांवरील खराब अवस्था तसेच अन्नपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचण्यांच्या नोंदींचा अभाव आढळल्याने या हॉटेलचा परवानाही रद्द करण्यात आला. तसेच अमरावती येथील ‘अमरावती दरबार’ हॉटेलमध्ये कोणत्याही वैध अन्न परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने तेथील व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
हॉटेल आस्थापनांवरील कारवाईसोबतच एफडीएने राज्यातील रक्तपेढ्यांवरही मोठी मोहीम राबवत रक्तसुरक्षेशी तडजोड करणाऱ्या ३८ रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई केली आहे. यामध्ये गंभीर नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक मानकांचे पालन न केल्याप्रकरणी ३४ रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, चार रक्तपेढ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील जेजे महानगर रक्तपेढीचाही समावेश असून, आवश्यक निकषांची पूर्तता करण्यात अपयश आल्यामुळे तिचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. तसेच बदलापूर येथील माया ब्लड सेंटरमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याने या केंद्राला कामकाज बंद करण्याचे आदेश देत ते सील करण्यात आले आहे. रक्तदाते आणि रुग्णांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, तसेच रक्ताची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हे अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. राज्यभरातील हॉटेल्स, अन्न व्यवसाय आणि रक्तपेढ्यांमध्ये नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी अशा अचानक तपासण्या आणि कठोर कारवाया भविष्यातही अधिक तीव्रतेने सुरू राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.






