मुंबई : मुंबईतील ‘आरे–कफ परेड मेट्रो ३’ या भुयारी मार्गिकेवर अखेर सर्व प्रमुख मोबाईल सेवा कंपन्यांचे नेटवर्क उपलब्ध झाले असून, प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. आतापर्यंत या मार्गिकेवर मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने प्रवाशांना प्रवासादरम्यान फोन कॉल, इंटरनेट सेवा तसेच इतर ऑनलाइन कामे करता येत नव्हती. विशेषतः नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत होता. त्यामुळे या मार्गिकेवर मोबाईल नेटवर्क सेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने ३३.५ किलोमीटर लांबीची मुंबईतील पहिली पूर्ण भुयारी मेट्रो मार्गिका टप्प्याटप्प्याने सुरू केली. ऑक्टोबर २०२४ मध्ये आरे–बीकेसी हा पहिला टप्पा, मे २०२५ मध्ये बीकेसी–आचार्य अत्रे चौक हा दुसरा टप्पा, तर ऑक्टोबर २०२५ मध्ये आचार्य अत्रे चौक–कफ परेड हा अंतिम टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये एअरटेल आणि व्होडाफोनच्या नेटवर्क सेवा उपलब्ध होत्या, मात्र जिओची सेवा नव्हती. अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर संपूर्ण मार्गिकेवर कोणत्याही मोबाईल कंपनीची सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यानंतर दूरसंचार पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या कंपनीबाबत निर्माण झालेल्या वादामुळे मोबाईल सेवा सुरू होण्यास विलंब झाला आणि मार्च २०२६ मध्ये उपलब्ध असलेल्या काही नेटवर्क सेवाही बंद पडल्या.
एमएमआरसीने संबंधित दूरसंचार कंपन्यांशी समन्वय साधून हा वाद सोडविल्यानंतर टप्प्याटप्प्याने नेटवर्क सेवा पुन्हा सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले. सर्वप्रथम आरे–बीकेसीदरम्यान एअरटेलची सेवा सुरू करण्यात आली, त्यानंतर आरे–आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंत व्होडाफोनची नेटवर्क सुविधा उपलब्ध झाली. याच काळात जिओ कंपनीकडूनही संपूर्ण मार्गिकेवर सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक उपकरणे बसविण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. अखेर सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर आरे ते कफ परेड या संपूर्ण मेट्रो ३ मार्गिकेवर सर्व प्रमुख मोबाईल कंपन्यांची नेटवर्क सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना संपूर्ण प्रवासादरम्यान मोबाईल कॉल, इंटरनेट, ऑनलाइन व्यवहार तसेच लॅपटॉपवरून कार्यालयीन कामे सहज करता येणार आहेत. भुयारी मेट्रो प्रवास अधिक सोयीस्कर आणि अखंड कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा अनुभव सुधारण्यास मदत होणार असून, भविष्यात या मार्गिकेवरील प्रवासी संख्येतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोबाईल नेटवर्क उपलब्ध झाल्यामुळे मेट्रो ३ मार्गिका आता केवळ जलद आणि सुरक्षित प्रवासाचे साधन न राहता डिजिटल सुविधांनी सुसज्ज अशी आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून अधिक प्रभावी ठरणार आहे.






