सावंतवाडी : बिगरमोसमी पावसाने सावंतवाडी तालुक्याला झोडपून काढले असून, सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आंबोली घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वस मंदिरापासून सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर ही घटना घडली. डोंगरावरून माती आणि दगड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.तातडीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) तात्काळ घटनास्थळी धाव घेत दरड हटवण्याचे काम सुरू केले. युद्धपातळीवर काम करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. वळीवाच्या पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने वाहनधारक आणि स्थानिक नागरिक चिंतेत पडले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यटकांना आणि वाहनधारकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. दरड हटवण्याचे काम वेगाने सुरू असून, लवकरच रस्ता पूर्णपणे मोकळा होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.







