मुंबई : राज्यातील उच्च माध्यमिक बोर्डाकडून ११ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ उडाला आहे. ११ वी प्रवेशाची वेबसाईट ४ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे १० वीचा निकाल लागल्यानंतर ११च्या प्रवेशाची आतुरतेने वाट पाहणारे विद्यार्थी काळजीत पडले आहेत. शिक्षण संचालनालयाकडून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश २६ मे पासून सुरू होणार आहे. त्यानंतर पहिली फेरी सुरू होईल. त्यामुळे, गेल्या २ दिवसांपासून ऑनलाईन प्रवेशासाठी धडप़ड करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी ४ दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.
अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया २१ मे रोजी प्रत्यक्षात सुरू होणार होती. मात्र वेबसाईट काही तांत्रिक अडचणीमुळे सुरू झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र शिक्षण महामंडळाकडून २६ मे ही नवी तारीख देण्यात आली आहे. २६ मे ते ३ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येणार आहे. तर ५ जून रोजी पहिली जनरल मेरीट लागणार आहे. ६ ते ७ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना हरकती नोंदवता येतील. त्यानंतर, ८ जून रोजी अंतिम जनरल मेरीट लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. तर, अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी १० जूनला जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक वेळ देण्यासाठी कटिबद्ध आहोत. बोर्डाचे वेबपोर्टल मोबाईलद्वारे अधिक सुलभ हाताळता यावं यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे, असा खुलासा बोर्डाकडून करण्यात आला आहे. विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये. बोर्डाची साईट सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अपडेट देण्यासाठी व्हॉट्स अप चॅनेल सुरू करण्यात आलं आहे. त्यावर आपल्याला लगेच माहिती देण्यात येईल, असं आवाहनही करण्यात आलं आहे.





