मुंबई : पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या करोना विषाणूनं संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. या महामारीत लाखो भारतीयांना आपले प्राण गमावावे लागले. त्याशिवाय देशाला टाळेबंदीचा सामनाही करावा लागला. करोना विषाणू नेमका कशामुळे उद्भभवला या संदर्भातील तपास अद्यापही प्रलंबित आहे. यादरम्यान, भारतात पुन्हा एकदा करोना विषाणूनं डोकं वर काढलं आहे. करोनामुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरी काही भागांमध्ये नव्यानं वाढलेल्या संसर्गाच्या लाटेमुळे प्रशासन अलर्ट झालं आहे. दरम्यान, भारतातील कोणकोणत्या राज्यांत करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत? करोनामुळे पुन्हा टाळेबंदीचा सामना करावा लागणार का? हे जाणून घेऊ…
हाँगकाँग व सिंगापूर यांसारख्या देशांमध्ये करोनानं बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सिंगापूरनं या विषाणूचा थेट संबंध JN.1 या व्हेरियंटशी असल्याचं म्हटलं आहे. भारतामध्येही मागील काही आठवड्यांत करोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, देशात सध्या करोनाची २५७ सक्रिय प्रकरणं आहेत. मुंबई, चेन्नई व अहमदाबाद या शहरांमध्ये रुग्णसंख्येत किरकोळ; पण सातत्यपूर्ण वाढ होत आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाने निरीक्षण वाढवले आहे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. देशातील करोना विषाणूच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. राज्य आरोग्य विभागानुसार, मे महिन्यात एकट्या मुंबईत करोनाच्या ९५ नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. विशेष बाब म्हणजे संपूर्ण राज्यात जानेवारीपासून केवळ १०६ प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी ५२ रुग्णांना करोनाची सौम्य लक्षणं आहेत; तर १६ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही रुग्णांना परळ येथील केईएम आणि अंधेरी-मरोळ परिसरातील सेवन हिल्स या रुग्णालयांत हलविण्यात आलं आहे.
देशभरात करोना विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पुन्हा टाळेबंदी लागू होणार अशा अफवांना ऊत आला आहे. मात्र, करोनाची परिस्थिती नियंत्रणात असून, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. फक्त प्रत्येकानं खबरदारी घ्यायला हवी. गर्दीच्या ठिकाणी गरज भासल्यास मास्कचा वापर करावा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. सध्या करोनाचा संसर्ग अत्यंत सौम्य प्रमाणात असल्याचं दिसून येत आहे. बाधित झालेल्या बहुतेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासलेली नाही. तरीही आरोग्य मंत्रालय सतर्क असून, परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी योग्य त्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.







