मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या लाखो कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव हा वर्षातील सर्वात मोठा आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा सण मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या आगमनासाठी गावी जाण्याची तयारी आतापासूनच सुरू झाली असून रेल्वे आरक्षणावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. १४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीगणेश चतुर्थी असल्याने मोठ्या संख्येने प्रवासी कोकणाकडे रवाना होणार आहेत. मात्र, नियमित रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट मिळवणे यंदा अत्यंत कठीण झाले आहे. रेल्वेच्या ६० दिवस आधी आरक्षण सुरू होताच काही मिनिटांतच सर्व जागा संपत असून आयआरसीटीसीवर अनेक गाड्यांसाठी थेट ‘रिग्रेट’चा संदेश दिसू लागला आहे. त्यामुळे हजारो चाकरमान्यांची चिंता वाढली आहे. १० जुलैपासून गणेशोत्सवाच्या प्रवासासाठी आरक्षण सुरू झाल्यानंतर तिकीटांसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. ११ सप्टेंबरच्या रात्री मुंबईहून निघणाऱ्या प्रवासासाठी १३ जुलै रोजी सकाळी आरक्षण सुरू होणार असून १२ आणि १३ सप्टेंबरच्या प्रवासासाठी अनुक्रमे १४ आणि १५ जुलै रोजी बुकिंग करता येणार आहे. तसेच गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर १७ सप्टेंबरच्या प्रवासासाठी १९ जुलैपासून आरक्षण उपलब्ध होणार असल्याने त्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना आरक्षणाची तारीख आणि वेळ लक्षात ठेवून तत्काळ बुकिंग करण्याची गरज निर्माण झाली आहे. यंदा सुरुवातीपासूनच मागणी विक्रमी असल्याने अनेकांना आरक्षण मिळण्यापूर्वीच प्रतीक्षा यादीही पूर्ण झाल्याचा अनुभव येत आहे.
मुंबई-गोवा आणि कोकण मार्गावरील प्रमुख रेल्वे गाड्यांमध्ये सध्या जागा उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्रेन क्रमांक २०१११ कोकणकन्या एक्स्प्रेस, १२१३३ मंगळुरू एक्स्प्रेस, १९०५७ सुरत–मंगळुरू एक्स्प्रेस आणि २२१५० पुणे–एर्नाकुलम एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये ९ सप्टेंबरच्या प्रवासासाठी तिकीट बुक करताना थेट ‘रिग्रेट’ दाखवले जात आहे. आरामदायी प्रवासासाठी लोकप्रिय असलेली वंदे भारत एक्स्प्रेसदेखील त्याच दिवशी वेटिंग लिस्टमध्ये पोहोचली असून जनशताब्दी एक्स्प्रेस, वांद्रे–मडगाव एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांची प्रतीक्षा यादीही मर्यादेपलीकडे गेली आहे. परिणामी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि मीरा-भाईंदर परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांची मोठी अडचण झाली आहे. सामान्य आरक्षणातून तिकीट मिळण्याची शक्यता कमी झाल्याने आता सर्वांच्या नजरा रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन शेकडो विशेष गाड्या चालवल्या जातात. यंदाही नियमित गाड्यांमधील तिकीटांची कमतरता आणि वाढती मागणी लक्षात घेता अतिरिक्त विशेष रेल्वे फेऱ्यांची तातडीने घोषणा करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. वेळेत विशेष गाड्या सुरू झाल्यास हजारो भाविक आणि चाकरमानींना गावी जाण्यास मोठा दिलासा मिळेल आणि गणेशोत्सवाचा प्रवास अधिक सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






