पुणे : आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक दाखल होत असल्याने त्यांच्या प्रवासाची सोय अधिक सुरक्षित, सुलभ आणि विनासायास व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) व्यापक नियोजन केले आहे. यंदा यात्रेच्या पार्श्वभूमीवर तब्बल ५,५०० विशेष एसटी बसेस सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी चंद्रभागा बसस्थानक परिसरात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी भाविकांसाठी दिलासादायक घोषणा करत सांगितले की, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित नोंदणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे ग्रामीण भागातील वारकऱ्यांना प्रवासासाठी अतिरिक्त धावपळ करावी लागणार नाही. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यंदाच्या विशेष बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती पूर्वीप्रमाणे लागू राहणार आहेत. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना विशेष बसेसमधून पूर्णपणे मोफत प्रवास करता येणार आहे, तर ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत सर्व महिला प्रवाशांना एसटी तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या विशेष सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगारात आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.
यात्रेदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देगाव येथील भीमा तात्पुरत्या बसस्थानकाला भेट देत तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. भाविकांची गर्दी सुरळीतपणे हाताळण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पंढरपूर शहरात चंद्रभागा बसस्थानक, भीमा बसस्थानक (देगाव), विठ्ठल कारखाना बसस्थानक आणि पांडुरंग बसस्थानक (आयटीआय महाविद्यालय) अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, दिशादर्शक फलक तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आषाढी यात्रेदरम्यान एसटी महामंडळाने ५,१४५ विशेष बसेसच्या माध्यमातून सुमारे २१ लाख ९५ हजार भाविकांना सुरक्षित सेवा दिली होती. यंदा भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने परतीच्या प्रवासासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. यात्राकाळात अखंड सेवा देणाऱ्या सुमारे १३ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि पर्यवेक्षकांसाठीही परिवहन मंत्र्यांनी विशेष घोषणा केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या चहा, नाश्ता आणि भोजनाचा संपूर्ण खर्च आपण वैयक्तिकरित्या उचलणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांनी भाविकांशी नम्रपणे, संयमाने आणि आदराने वागावे, जेणेकरून वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि समाधानकारक होईल, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.






