मुंबई : मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे आता त्यांच्या समर्थनात उतरले आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून घाणेरड्या कापडाने झाकून ठेवला होता. अमितने त्याचे अनावरण करून सन्मान राखला, तरीही त्याच्यावर गुन्हा दाखल करता? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला. ही दादागिरी मोडून काढू असाही इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी, कबुतरांपेक्षा महाराजांसाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगलं आहे असं अमित ठाकरे म्हणाले.
अमित ठाकरे यांच्यावर आतापर्यंतचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिलाच गुन्हा हा महाराजांसाठी दाखल झाला हे चांगलं झालं असं अमित ठाकरे म्हणाले. कबुतरांपेक्षा शिवाजी महाराज यांच्यासाठी गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगलं आहे असंही ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या घरात वाढलो आहे, त्यामुळे याला कोर्टात सामोरं जाईन असं अमित ठाकरे म्हणाले. तसेच राज ठाकरेंना ही गोष्ट समजली तेव्हा ते फक्त हसले असंही अमित ठाकरे म्हणाले. गेल्या चार महिन्यांपासून हा पुतळा झाकून आहे. पंतप्रधान मुंबईत आले, त्यांनी नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटनही केलं. दहिहंडीच्या दिवशी अनेक नेते आले, जाहिरातबाजी केली. पण एकानेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं नाही. त्यामुळे आम्ही त्या पुतळ्याचं अनावरण केलं असं अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरेंनी नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण परवानगी न घेता केलं. गेल्या चार महिन्यांपासून तो पुतळा कापडामध्ये बांधून ठेवल्याचं समजताच अमित ठाकरेंनी त्याचं अनावरण केलं. मात्र त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली. आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! 4 महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने, त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं, महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? मोडून काढू ही दादागिरी, निवडणूक आयोग सरकारची!







