नवी मुंबई : नेरूळ गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने वीजमीटरला बायपास करून स्वत:च्या घरात थेट वीजजोडणी घेऊन मागील तीन वर्षांपासून तब्बल नऊ लाख १६ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. मकरंद रघुनाथ कडू असे या व्यक्तीचे नाव असून महावितरणच्या भरारी पथकाने त्यांच्या घरगुती वीजमीटरची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महावितरणने त्यांच्यासह त्याच्या आईविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात वीजचोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणच्या भरारी पथकाने जास्त उपकरणे वापरणाऱ्या परंतु वीजबिल कमी येणाऱ्या घरांची माहिती काढून त्या घरांच्या वीजजोडणीच्या तपासणीला सुरुवात केली आहे. या तपासणीत नेरूळ गावातील रघुनाथ कडू यांच्या घरात एकापेक्षा जास्त एअर कंडिशन तसेच इतर विद्युत उपकरणे असताना, त्यांच्या घराचा विद्युत भार हा ५.६ केडब्ल्यू इतका असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना विजेचे बिल खूप कमी येत असल्याने महावितरणच्या वाशी परिमंडळातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे व त्यांच्या भरारी पथकाने कडू यांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी कडू यांच्या घरगुती विजेचे मापन व्यवस्थितरीत्या होऊ नये, यासाठी कडू यांनी विजेचे मीटर बायपास करून थेट वायर जोडल्याचे व त्याद्वारे ते घरामध्ये वीजवापर करत असल्याचे आढळले. कडू यांनी जुलै २०२०पासून ३६ महिने विजेची चोरी करून महावितरणचे नऊ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळून आले.