मुंबई : महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये २००८ साली २६-११ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता. या हल्ल्याला यंदाच्या २६ तारखेला १७ वर्षे पूर्ण होत आहेत. यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या लोकांना आणि शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी दहशतवादी हल्ले आणि त्यामधून पाकिस्तानच्या नापाक हरकतींवर भाष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील या कार्यक्रमामध्ये पाकिस्तानवर दहशतवादी हल्ल्ल्यावरुन जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, आपण भारताचा थेट युद्धात पराभव करु शकत नाही हे पाकिस्तानला माहित आहे. त्यामुळे पाकिस्तान छद्म युद्ध लढण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे दिल्ली स्फोट घडवून आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण भारत बदलला आहे. या बदललेल्या भारताने तीन हजार किलो आरडीएक्स पकडलं आणि कारवाई केली. अन्यथा त्यांचा डाव हा भारताच्या प्रत्येक भागात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा होता मुंबईसह देशाचे अनेक शहर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होते. पण भास्ताच्या अनेक एजन्सीजने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी आरोपींनी दिल्लीत एक स्फोट घडवून आणत आपल्या अस्तित्व दाखवले. पुढे देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवादी हल्ल्यापासून सावध राहण्याबाबत भूमिका घेतली. “पाकिस्तानकडून धोका तर कायम आहेच. कारण पाकिस्तान थेट युद्ध करु शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारे कोणती ना कोणती घटना करून जगभारात आपले अस्तित्व दाखवण्याचं काम आणि भारताविरोधात अशाप्रकारचा कट करण्याचं काम करत राहतील, आपल्या सगळ्यांना अलर्ट व्हावं लागेल. सजग राहावं लागेल” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.







