नवी दिल्ली : भारतात प्रथमच डेंग्यू प्रतिबंधासाठी लसीला मंजुरी मिळाली असून, हा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) यांनी जपानी औषधनिर्माता कंपनी ताकेडा बायोफार्मास्युटिकल्सच्या ‘क्यूडेंगा’ (QDENGA/TAK-003) या डेंग्यू लसीला बाजारात वापरण्यास परवानगी दिली आहे. ही लस ४ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींना दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे, ही लस घेण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला यापूर्वी डेंग्यूची लागण झाली होती की नाही, यासाठी कोणतीही पूर्व तपासणी करण्याची आवश्यकता नाही. कंपनीच्या माहितीनुसार, भारत हा जगातील डेंग्यूचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या देशांपैकी एक असून, ही लस डेंग्यू विषाणूच्या चारही प्रकारांपासून (सेरोटाइप्स) संरक्षण देण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. ताकेडा इंडियाचे वैद्यकीय व्यवहार प्रमुख गोह चू बेंग यांनी सांगितले की, या मंजुरीमुळे भारतातील डेंग्यू प्रतिबंध मोहिमेला मोठी चालना मिळेल. मात्र, लसीकरणाबरोबरच डास नियंत्रण, नियमित सर्वेक्षण, जनजागृती आणि सार्वजनिक आरोग्य उपाययोजनाही तितक्याच महत्त्वाच्या राहतील. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) डेंग्यूचा प्रादुर्भाव असलेल्या भागांमध्ये या लसीच्या वापराची शिफारस केली आहे. भारतातील मंजुरीपूर्वी या लसीच्या फेज-१, फेज-२ आणि फेज-३ अशा एकूण १९ क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या असून, त्यामध्ये २८ हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. या चाचण्यांमध्ये लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता समाधानकारक आढळल्यानंतरच तिला मंजुरी देण्यात आली आहे.
‘क्यूडेंगा’ ही दोन डोसची लस असून, प्रत्येक डोस ०.५ मिलीलीटर इतका असतो आणि तो त्वचेखाली इंजेक्शनद्वारे दिला जातो. दोन्ही डोसांमध्ये तीन महिन्यांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. या लसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तिचे उत्पादन भारतातच होणार आहे. यासाठी ताकेडा कंपनीने हैदराबादस्थित बायोलॉजिकल ई या भारतीय औषधनिर्माता कंपनीसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे भविष्यात देशांतर्गत उत्पादन वाढून लसीचा पुरवठा अधिक वेगाने आणि सुलभपणे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ही लस डेंग्यूमुळे होणारे गंभीर आजार आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. मात्र, डेंग्यूपासून संपूर्ण संरक्षणासाठी केवळ लसीकरणावर अवलंबून न राहता डासांची उत्पत्ती रोखणे, साचलेले पाणी हटवणे, मच्छरदाणी व रिपेलंटचा वापर करणे आणि तापाची लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. भारतात डेंग्यूविरोधातील लसीकरणाचा हा पहिला महत्त्वाचा टप्पा असून, त्यामुळे भविष्यात डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेला मोठी मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






