यवतमाळ : माईसाहेब आंबेडकर मला दत्तक घेण्याची शक्यता होती. तसे झाले असते तर मी रामदास आठवले ऐवजी रामदास आंबेडकर झालो असतो, असा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. यवतमाळमध्ये आले असता रामदास आठवले बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मला आदर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत. नातू होण्याची संधी मला मिळाली नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आदर आहे. ते हुशार आहेत. पण कोणत्यावेळी कोणती भूमिका घ्यावी हे त्यांच्या लक्षात येत नाही. माझ्या लक्षात येतं. त्यामुळे त्यांनी मतं खाण्याचं काम करू नये, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही भाष्य करताना ते म्हणाले की, अजित पवार हे युतीत आल्याने भाजपच्या मतांवर काहीच परिणाम होणार नाही. अजित पवार, एकनाथ शिंदे या सगळ्यांना मंत्रीपद मिळाले. आम्हाला मिळाले नाही. मंत्रिपद द्यावं ही आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारत मंत्री पद देऊ म्हणून सांगितले होते. मात्र अजित पवार यांचा विस्तारात समावेश होईल हे मलाही माहिती नव्हतं. असं असलं तरी आरपीआयला मंत्रीपद मिळावं ही आमची मागणी कायम आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
गेल्या निवडणूकीत आमच्या पक्षाला माळशिरसमधून राम सातपुते आणि नायगावमधून राजेश पवार अशी दोन तिकीटे दिली होती. पण त्यांना कमळ चिन्ह दिले होते. यावेळी मात्र आम्ही भाजपच्या चिन्हावर लढणार नाही. आरपीआयच्या चिन्हावरच लढू. आमच्या पक्षाला नागालँडमध्ये मान्यता आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आम्हाला आमच्या चिन्हावर लढवायची आहे, असे आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी लोकसभेच्या दोन जागा मिळाल्या पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी स्वत: शिर्डीतून पराभूत झालो होतो. यावेळी मात्र मला शिर्डीतून संधी मिळाली तर मी लोकसभा लढविन. माझी राज्यसभेची मुदत २०२४ पर्यंत आहे. मी लोकसभेचा माणूस आहे. शिर्डी, पंढरपूर किंवा मुंबईतून उभा राहिलो असतो तर विजयी झालो असतो. मी राज्यसभा मागितली होती. मला लोकसभेची संधी मिळाली तर मी लढणार आहे, असंही त्यांनी सांगितले.