वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव करून २०२६ चा आयसीसी टी-२० विश्वचषक आपल्या नावावर केला आणि संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विजयाचा जल्लोष सुरू असताना हार्दिक पांड्या आणि त्याची मैत्रीण महिका शर्मा यांनी मैदानावर जे वर्तन केले, त्यावरून सध्या सोशल मीडियावर संतापाची लाट असून, हार्दिकवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अधिकच्या माहितीनुसार, सामन्याच्या सांगतेनंतर बक्षीस वितरणासाठी उभारण्यात आलेल्या मुख्य मंचावर (स्टेजवर) हार्दिक पांड्या आणि महिका शर्मा यांचे काही क्षण कॅमेऱ्यात टिपले गेले. यावेळी हार्दिकच्या खांद्यावर भारताचा गौरव असलेला तिरंगा होता आणि गळ्यात विश्वचषकाचे सुवर्णपदक होते. या स्थितीत तो महिकासोबत मंचावर झोपल्याचे दिसून आले. भारतीय राष्ट्रध्वजाचा असा वापर करणे आणि सार्वजनिक मंचावर अशा प्रकारे वर्तन करणे हे अनेकांना रुचलेले नाही.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने केलेल्या एका कृत्यामुळे तो आता मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे. पुण्याचे वकील वाजिद खान यांनी हार्दिक पांड्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिकृतपणे तक्रार (FIR) दाखल केली आहे. वकील वाजिद खान यांनी आपल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की, विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने त्याची मैत्रीण महिका शर्मा हिच्यासोबत मैदानावर जे वर्तन केले, ते भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे आहे. हार्दिकने भारताचा तिरंगा आपल्या अंगाभोवती गुंडाळला होता आणि त्याच स्थितीत तो महिकासोबत मैदानावर नाचत होता. इतकेच नव्हे तर, तिरंगा परिधान केलेला असताना तो महिकासोबत बक्षीस वितरणाच्या मंचावर झोपल्याचेही दिसून आले. या प्रकरणातील मुख्य आक्षेप असा आहे की, भारतीय राष्ट्रध्वज हा देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. ‘भारतीय ध्वज संहिता’ (Flag Code of India) नुसार राष्ट्रध्वजाचा वापर कोणत्याही प्रकारे वैयक्तिक वस्त्र म्हणून किंवा जमिनीवर टेकवून करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. वाजिद खान यांच्या दाव्यानुसार, हार्दिकने तिरंगा अंगावर घेऊन अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी नृत्य करणे आणि जमिनीवर झोपणे, हे कृत्य तिरंग्याची प्रतिष्ठा मलीन करणारे आहे. या कृत्यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. भारतीय क्रिकेट संघाला मिळालेल्या या विजयाच्या जल्लोषात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची मैत्रीण महिका शर्मा यांनी मैदानावर जे कृत्य केले, त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) प्रसारित झाल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.






