मुंबई : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थिती आणि युद्धजन्य वातावरणाचा परिणाम देशातील विविध सेवांवर दिसू लागला आहे. त्याचा परिणाम आता रेल्वे व्यवस्थेवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांसाठी ‘रेडी टू इट’ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा प्रकर्षाने जाणवू लागला आहे. मुंबईतील उपहारगृहात सिलिंडरची कमतरता भासू लागल्याने, त्यांनी पदार्थांची संख्या कमी केली आहे. अनेक उपहारगृहांनी पुरी, पापड, चायनीज पदार्थाची विक्री करणे बंद केले आहे. तसेच जादा गॅसचा वापर करून तयार होणारे पदार्थ करणे बंद केले आहेत. त्याचे पडसाद इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या स्वयंपाक घरावरही दिसत आहेत. अनेक पदार्थ तयार होणार नसल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहजपणे खाता येतील असे ‘रेडी टू इट’ पदार्थ पुरवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना पॅकबंद पदार्थ वाटण्यात आले.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसह त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान, लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अडचण येऊ नये म्हणून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे, देशात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सर्व फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रुम आणि जनआहार येथे केटरिंग सेवा अखंडित सुरू राहण्यासाठी, मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन या पर्यायी स्वयंपाक पद्धतींचा वापर करावा. तसेच इतर अन्नपदार्थांव्यतिरिक्त प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी रेडी टू ईट अन्नपदार्थांची पुरेशी सोय करावी. एलपीजीद्वारे स्वयंपाक करणे बंद केले असल्यास, तत्काळ पश्चिम विभाग नियंत्रणाशी संपर्क साधावा, असे पत्र इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारे संबंधितांना पाठविले आहे. आयआरसीटीसीच्या मुंबई सेंट्रल बेस्ड किचनमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा सुरू आहे. हे किचन चालू असून प्रवाशांना खाद्यपदार्थ देण्यात येत आहेत. परंतु, जर येत्या काळात व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा जाणवल्यास, तरीही किचन सुरू राहण्याची योजना आखण्यात आली आहे. रेल्वेची अत्यावश्यक सेवा असून त्यासाठी सिलिंडर दिले जातील. त्यामुळे किचन बंद होण्याची शक्यता नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.







