मुंबई/ठाणे : राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५ जानेवारी रोजी मुंबई, ठाणेसह २९ महापालिकाध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी सरकार कडून सर्व नोकरदार वर्गास भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५(बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये काही संस्था/आस्थापना त्यांच्या कामगारांना मतदानाची भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत असे आढळून आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे १५ रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार असून या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामधील सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.







