वृत्तसंस्था : आधार कार्ड हे आता भारतातील सर्वात मोठे आणि विश्वासार्ह ओळखपत्र बनले आहे. बँकिंग असो, मोबाईल कनेक्शन असो, सरकारी योजनांचा लाभ असो किंवा ऑनलाइन पडताळणी असो प्रत्येक ठिकाणी आधार आवश्यक आहे. मात्र, आधारशी जोडलेला मोबाइल नंबर अनेक वेळा बदलतो, हरवतो किंवा बंद होतो. यामुळे ओटीपी (OTP) येत नाही आणि महत्त्वाची कामे थांबतात.
२०२५ मध्ये UIDAI ने ही मोठी समस्या सोडवली आहे. आतापर्यंत मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी लोकांना आधार केंद्रावर जावे लागत होते, रांगेत उभे राहावे लागत होते आणि अनेकदा कागदपत्रेही दाखवावी लागत होती. UIDAI ने आपल्या नवीन ‘आधार ॲप’च्या (Aadhaar App) लॉन्चसह मोठी घोषणा केली आहे की, आधारमधील मोबाइल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया आता लवकरच घरबसल्या, ‘ओटीपी + फेस ऑथेंटिकेशन’ (OTP + Face Authentication) च्या माध्यमातून केली जाऊ शकेल. म्हणजेच, आता तुम्हाला आधार सेवा केंद्रांपर्यंत जाण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. हा बदल अशा लोकांसाठी वरदान ठरणार आहे, ज्यांचा जुना नंबर बंद झाला आहे, सिम कार्ड बदलले आहे किंवा जे कोणत्याही कारणामुळे आधार केंद्रावर जाऊ शकत नाहीत. कमी वेळेत अधिक सुविधा उपलब्ध करणे आणि आधार सेवा अधिक डिजिटल, सोप्या आणि जलद बनवणे, हे UIDAI चे उद्दिष्ट आहे.
UIDAI ने जारी केलेल्या पोस्टर आणि माहितीनुसार संभाव्य प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
- Aadhaar App डाउनलोड करा: QR कोड स्कॅन करून किंवा Google Play / App Store वरून ॲप डाउनलोड करा.
- ॲप उघडा आणि तुमचा १२-अंकी आधार नंबर टाका.
- कॅमेऱ्यासमोर चेहरा स्कॅन करा, ॲप तुमचे ‘फेस मॅच’ करेल.
- तुम्हाला जो नवीन नंबर अपडेट करायचा आहे, तो प्रविष्ट करा.
- त्या नवीन मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी एंटर करा.
- स्क्रीनवर “Mobile Number Updated Successfully” असा संदेश दिसेल.







