ठाणे : कल्याण शहरात लाखोंच्या संख्येने धावणाऱ्या रिक्षांमुळे वाहतूककोंडी होण्यासह प्रदूषणात भर पडत आहे. त्यामुळेच प्रदूषणमुक्त ई-रिक्षांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या प्रदूषणविरोधी विभागाने सुरू केला आहे. या अंतर्गत चार ठिकाणी प्रीपेड चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे. सध्या शहरात अवघ्या चार ते पाच ई-रिक्षा असल्या तरी इतर इंधनाच्या तुलनेत ई-रिक्षा आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असल्याने रिक्षाचालक ई-रिक्षांकडे वळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कल्याणमध्ये लाखोंच्या संख्येने रिक्षा धावतात. नियम धाब्यावर बसवून धावणाऱ्या या रिक्षांमुळे वाहतूककोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यातच सरकारच्या मागेल त्याला परवाना धोरणामुळे दिवसाला किमान ४० ते ५० रिक्षा नव्याने दाखल होत असल्याने शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानक परिसरात सुरू असलेले स्मार्ट सिटीच्या उड्डाणपुलाचे काम आणि मुंगीच्या गतीने चालणाऱ्या रिक्षांमुळे स्थानक परिसराला वाहतूककोंडीचा विळखा पडला आहे. या कोंडीसह शहरातील प्रदूषणातही वाढ होत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी ई-वाहनांसह ई-रिक्षांना प्रोत्साहन दिले जाते. पर्यावरणपूरक ई-रिक्षांसाठी रिक्षाचालकांना प्रोत्साहन देण्याकरिता पालिकेने कल्याणमध्ये चार ठिकाणी प्रीपेड चार्जिंग स्टेशन उभारण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ही सुविधा रिक्षाचालकांचा वेळ आणि पैसे वाचविणारी ठरणार आहे.