पनवेल : रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातील मोबाईल फोन खेचून दुचाकीवरून धूम ठोकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. भारत राठोड (वय १९), देवानंद जाधव (वय १९), दीपक राठोड (वय १९) आणि वैभव जगताप (वय २४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या चौकशीत नवी मुंबई परिसरात मोबाईल चोरीचे १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखेने त्यांच्याकडून पाच लाख दोन हजार ७०० रुपये किमतीचे २९ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. आरोपी हे पनवेल आणि कळंबोली भागात राहणारे आहेत. हे लुटारू मोबाईल फोनवर बोलत रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातील मोबाइल फोन खेचूनन धूम स्टाईलने दुचाकीवरून पळून जात होते. काही दिवसांपासून या टोळीने तळोजा, कळंबोली, कामोठे, पनवेल या भागांत हैदोस घातला होता.
पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त अमित काळे यांच्या आदेशावरून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलिस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, दिलीप भंडे, सुनील गिरी यांच्या पथकाने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती मिळविली. त्यानंतर सर्व घटनास्थळी तांत्रिक तपास करून आरोपीबाबत माहिती संकलित केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींविषयी गोपनीय माहिती मिळवून त्यांना पनवेल तालुक्याच्या हद्दीत घडलेल्या मोबाईल फोन स्नॅचिंगच्या गुह्यात अटक केली. आरोपींच्या चौकशीत त्यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पनवेल तालुका २, कामोठे ५, तळोजा ५, पनवेल शहर, खांदेश्वर, कळंबोली, खारघर आणि सीबीडी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक असे १७ मोबाईल फोन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाख दोन हजार ७०० रुपये किमतीचे २९ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या टोळीकडून आणखी काही मोबाईल स्नॅचिंग व इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.