मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन आपण सार्वजनिक जीवनात प्रवेश केला असून, भावी पिढ्यांना नेतृत्वगुण, राजकारणातील शालीनता, संयम, नीतिमत्ता आणि लोकशाही मूल्यांचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यांनी अटलजींच्या संपूर्ण सार्वजनिक जीवनाचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन जिष्णु देव वर्मा यांनी केले. अटलजींच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील संस्मरणीय घटनांचा वेध घेणाऱ्या ‘अटल संस्मरण’ या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र लोकभवन येथे झाले. अटलजींचे माध्यम सल्लागार म्हणून दीर्घकाळ कार्य केलेले अशोक टंडन यांनी हा ग्रंथ लिहिला असून, वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्याचे प्रकाशन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, नेता कसा असावा, विरोधी पक्षनेता कसा असावा आणि सत्तेत असताना लोकशाही मूल्यांचे पालन कसे करावे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटल बिहारी वाजपेयी होत. ते प्रभावी वक्ते, दूरदृष्टीचे विचारवंत आणि सुसंस्कृत राजकारणी होते. उत्तरपूर्व भारतातील कठीण परिस्थितीत पक्षाचे काम करत असताना अटलजी कार्यकर्त्यांना सातत्याने प्रेरणा देत असत. त्यांच्याकडे भेटीस गेल्यावर ते उत्तरपूर्वेकडील प्रतिनिधींना प्रथम भेट देत असत. विरोधी पक्षात असताना जसे ते संयमी आणि तत्त्वनिष्ठ होते, तसेच पंतप्रधान झाल्यानंतरही राहिले. केवळ तेरा दिवसांचे सरकार संकटात आले तरी त्यांनी आपल्या वैचारिक बांधिलकीशी तडजोड केली नाही. संसदेचे तत्कालीन अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी ‘भारतीयता’ची व्याख्या विचारली असता, “आपण बंगालचे असूनही आपले नाव ‘सोमनाथ’ हे पश्चिम भारताशी जोडलेले आहे, हीच भारतीयता आहे,” असे अटलजींनी दिलेले उत्तर त्यांच्या व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोनाचे दर्शन घडवणारे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. आज कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा अणुऊर्जा, कोणतेही सामर्थ्य योग्य मूल्ये आणि नीतिमत्तेशिवाय समाजाच्या हितासाठी उपयोगी पडू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. आज अनेकांना अल्पावधीत मोठे नेतृत्व मिळवण्याची घाई असते; मात्र अटलजींनी आयुष्यभर कोणताही शॉर्टकट स्वीकारला नाही आणि संयम, प्रामाणिकपणा व तत्त्वनिष्ठेच्या बळावर लोकांचा विश्वास संपादन केला, असे राज्यपालांनी स्पष्ट केले.
यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ‘अटल संस्मरण’ हा उच्च साहित्यिक मूल्य असलेला, अटलजींच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज असल्याचे सांगितले. लेखक अशोक टंडन यांनी अनेक वर्षे अटलजींसोबत निकटून काम केल्यामुळे या ग्रंथातील प्रत्येक अनुभव वास्तवदर्शी, प्रेरणादायी आणि वाचकाला अंतर्मुख करणारा ठरला आहे, असे त्यांनी नमूद केले. अटलजींचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय होते; तरी त्यांच्या विचारांत, भाषणांत किंवा वागण्यात कधीही कटुता नव्हती. ते प्रभावी वक्ते, सुसंस्कृत राजकारणी आणि लोकशाहीवरील अढळ विश्वास असलेले नेते होते. मतभेद असले तरी संवाद आणि सहमतीच्या मार्गाने राजकारण करण्याची शिकवण त्यांनी देशाला दिली. कवीहृदय लाभलेले अटलजी स्वभावाने अत्यंत संवेदनशील होते; मात्र राष्ट्रीय हिताचा प्रश्न निर्माण झाला की ते वज्रासारखे ठाम आणि कठोर निर्णय घेणारे नेतृत्व ठरत. देशाला अणुऊर्जा संपन्न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर अनेक राष्ट्रांनी भारतावर निर्बंध लादले, तरी त्यांनी कोणताही दबाव न स्वीकारता राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले, असे शेलार यांनी सांगितले. लेखक अशोक टंडन यांनीही अटलजींसोबत सहा वर्षे काम करताना आलेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तेरा दिवसांचे सरकार स्थापन होण्यामागील घडामोडी, त्याकाळातील राजकीय परिस्थिती आणि विविध पक्षांच्या भूमिकांबाबत त्यांनी अनेक संस्मरणीय प्रसंग कथन केले. जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेला हा ग्रंथ अटल बिहारी वाजपेयी यांना वाहिलेली शब्दांजली असून, त्यांच्या विचारांचा आणि सार्वजनिक जीवनातील आदर्शांचा परिचय पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाशन समारंभाला गायक अनूप जलोटा, रवींद्र संघवी, बिनॉय बी. यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.







