मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, पाणी तुंबण्याच्या घटना, झाडे कोसळणे, उघड्या गटारांचा धोका आणि विविध आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेल्या असतानाच मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी मुंबई महानगरपालिकेची ‘१९१६’ ही आपत्कालीन दूरध्वनी सेवा बुधवारी सकाळच्या सुमारास तब्बल सहा तास बंद पडल्याची गंभीर घटना घडली. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहराच्या आपत्ती व्यवस्थापनातील महत्त्वाची संपर्क व्यवस्था ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महापालिकेच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अखेर सुमारे सहा तासांच्या प्रयत्नांनंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली. पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणे, झाडे किंवा फांद्या कोसळणे, धोकादायक इमारतींचे भाग पडणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा अनेक आपत्कालीन घटना घडत असतात. अशा वेळी नागरिक तातडीने मदतीसाठी ‘१९१६’ या क्रमांकावर संपर्क साधतात. मात्र, हीच सेवा बंद पडल्याने अनेक नागरिकांचे दूरध्वनी लागत नव्हते. परिणामी तक्रारी नोंदविणे, मदतीसाठी संपर्क साधणे आणि आपत्कालीन यंत्रणांपर्यंत माहिती पोहोचविणे अशक्य झाले. महापालिकेने या घटनेमागे दूरध्वनी सेवेमधील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचे सांगितले असले, तरी मुंबईसारख्या मोठ्या महानगरात आपत्कालीन सेवा इतक्या दीर्घकाळ बंद राहणे हे गंभीर नियोजनातील त्रुटीचे द्योतक असल्याची टीका होत आहे. या सहा तासांच्या कालावधीत एखादी मोठी दुर्घटना घडली असती, तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी दोन पर्यायी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिल्याचे सांगितले असले, तरी त्या क्रमांकांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत तात्काळ पोहोचली नाही. अनेक नागरिक समाजमाध्यमांचा वापर करत नसल्यामुळे पर्यायी क्रमांक शोधण्यातच त्यांचा वेळ गेला आणि आपत्कालीन मदत मिळण्यास विलंब झाला. ‘१९१६’ हा क्रमांक मुंबईकरांच्या परिचयाचा असल्याने सेवा अचानक बंद पडल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. आपत्कालीन नियंत्रण कक्षासाठी स्वतंत्र, सक्षम आणि तत्काळ कार्यान्वित होणारी पर्यायी संपर्क व्यवस्था असणे अपेक्षित असताना ती प्रभावीपणे कार्यरत का झाली नाही, याचे समाधानकारक उत्तर महापालिकेकडे नसल्याची टीका होत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मजबूत बॅकअप यंत्रणा उभारण्याची मागणी आता जोर धरत आहे. दरम्यान, महापालिकेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार दूरध्वनी सेवेतील तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला असून ‘१९१६’ ही आपत्कालीन सेवा पुन्हा सुरू झाली आहे. सेवा पूर्ववत झाली असली, तरी या घटनेमुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनातील उणिवा आणि पर्यायी यंत्रणेच्या अभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यासारख्या संवेदनशील काळात आपत्कालीन सेवा अखंड सुरू राहणे अत्यावश्यक असल्याने भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.







