मुंबई : मुंबईतील चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून मृत्यू झालेल्या ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याच्यावर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रस्ता क्रमांक ११ वरील दुर्दैवी अपघातात विहानचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंतिम प्रवासाला सुरुवात होत असताना “असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय” या शांतीमंत्राचा निनाद परिसरात घुमत होता. असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे नेण्याची प्रार्थना करणाऱ्या या मंत्राच्या साक्षीने विहानला अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईक, मित्र आणि शेजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकमग्न वातावरणात प्रशासकीय निष्काळजीपणाबद्दलचा संतापही व्यक्त होत होता. चेंबूरमधील ‘कुकरेजा हाईट्स’ येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. अल्ट्राटेक सिमेंटमध्ये अभियंता म्हणून कार्यरत असलेले विहानचे वडील धीराने पुढे चालत होते, तर आई जुही श्रीवास्तव आणि इतर कुटुंबीयांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला. अंत्यसंस्कारापूर्वी जुही श्रीवास्तव घरी मुलाची क्रिकेटची बॅट घट्ट मिठीत धरून शांत बसल्या होत्या. त्यांच्या आजूबाजूला नातेवाईक आणि शेजारी जमा झाले होते. त्या क्षणातील निःशब्द वेदना उपस्थित प्रत्येकाला हेलावून टाकणाऱ्या होत्या. देवनार स्मशानभूमीत अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबीयांनी विहानच्या पार्थिवाजवळ क्रिकेटचा चेंडू ठेवून त्याला भावपूर्ण निरोप दिला. क्रिकेटची विशेष आवड असलेल्या विहानच्या आठवणींना उजाळा देताना त्याचे आजोबा, उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील वकील एस. एन. श्रीवास्तव यांनी सांगितले की, त्यांनीच विहानला बॅट आणि चेंडू आणून दिला होता. तो उत्कृष्ट खवय्या होता आणि संपूर्ण हनुमान चालीसा तोंडपाठ म्हणून दाखवू शकत होता. या आठवणी सांगताना त्यांचे डोळे पाणावले.
या प्रकरणी संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्धार कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. “तक्रार नक्कीच करणार, पण त्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका विहानच्या आजोबांनी मांडली. दिल्लीहून आलेले विहानचे चुलत आजोबा आणि लोकसभेचे निवृत्त अतिरिक्त सचिव अनिल श्रीवास्तव यांनीही तीव्र भावना व्यक्त करत, “आमचे बाळ आता परत येणार नाही. कोणतीही नुकसानभरपाई त्याची भरपाई करू शकत नाही. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता,” असे सांगितले. त्यांनी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नागरी कामांसाठी खर्च होणाऱ्या निधीचा योग्य वापर करण्याची गरज अधोरेखित केली. धोकादायक झाडे, उघडी गटारे आणि इतर संभाव्य धोके वेळेत दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, अशी त्यांनी मागणी केली. अंत्यसंस्कारानंतर चितेचा धूर आकाशात विरत असताना परिसरात केवळ पावसाचा ओलसर सुगंध आणि दुःखाची गहिरी भावना शिल्लक राहिली होती. अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नातेवाईक आणि शेजारी रांगेने पुढे सरकत होते, तर कुटुंबीय एकमेकांचा आधार घेत उभे होते. शेजारी विनोद मल्होत्रा यांनी विहानच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, काही दिवसांपूर्वीच त्यांची विहानशी भेट झाली होती. त्याने हसत आपले वय “अकरा वर्षे” असल्याचे सांगितले होते. “तो खूप उंच झाला होता, अतिशय प्रेमळ आणि सगळ्यांचा लाडका मुलगा होता,” असे सांगताना त्यांचाही कंठ दाटून आला.







