नवी मुंबई : नवी मुंबईतील आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा थेट परिणाम भाजीपाला व्यवहारांवर दिसून आला आहे. भाजीपाल्याची आवक नियमित राहूनही ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने बुधवारी बाजारातील व्यवहार मंदावले. परिणामी अनेक भाज्यांच्या घाऊक दरात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीविना बाजारातच पडून राहिला. बुधवारी सुमारे ५५० वाहनांमधून विविध प्रकारच्या भाजीपाल्याची बाजारात आवक झाली होती. नेहमीप्रमाणे मध्यरात्रीनंतर दाखल होणारा हा माल सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरांतील व्यापारी तसेच किरकोळ विक्रेते उचलून नेतात. मात्र, सततच्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने व्यापारी आणि ग्राहक बाजारात पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे दुपारपर्यंतही मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजारातच पडून राहिला. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजने यांनी सांगितले की, मागणी कमी झाल्यामुळे घाऊक बाजारातील अनेक भाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. ही घसरण आवक कमी झाल्यामुळे नसून ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांच्या अनुपस्थितीमुळे झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर बाजारातील व्यवहार पुन्हा सुरळीत होतील आणि दरही स्थिर होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. घाऊक बाजारात दर कमी झाले असले, तरी त्याचा परिणाम किरकोळ बाजारात कितपत आणि किती लवकर दिसून येईल, हे पुढील काही दिवसांतील परिस्थितीवर अवलंबून राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास किरकोळ विक्रीवरही आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पावसामुळे केवळ विक्रीवरच नव्हे तर बाजारातील दैनंदिन कामकाजावरही मोठा परिणाम झाला. भाजी, फळ आणि मसाला बाजार परिसरातील अनेक ठिकाणी दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने व्यापारी, माथाडी कामगार आणि ग्राहकांना पाण्यातून मार्ग काढत व्यवहार करावे लागले. मालाची उचल आणि वाहतूक संथ गतीने सुरू राहिली, तर काही वाहनांमध्ये बिघाड झाल्याच्या घटनाही घडल्या. दरवर्षी पावसाळ्यात बाजारात पाणी साचत असल्याने भाजीपाला आणि फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. शेतमालाला पाणी लागल्याने तो झपाट्याने खराब होत असून त्याचा फटका व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही बसत असल्याचे भाजीपाला व्यापारी सुनील वाकचौरे यांनी सांगितले. बाजार सखल भागात असल्याने ही समस्या दरवर्षी निर्माण होते, मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महापालिका प्रशासनाकडून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप बाजारातील घटकांनी केला आहे. नालेसफाईचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात पाणी साचण्याची समस्या कायम असल्याने दोन्ही प्रशासनांमधील समन्वयाच्या अभावामुळे बाजारपेठेचे आणि शेतमालाचे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बुधवारी घाऊक बाजारात टोमॅटो १८ ते २२ रुपये, फरसबी ५५ ते ६५ रुपये, फुलकोबी १२ ते १६ रुपये, भेंडी २६ ते ३२ रुपये, तोंडली २६ ते ३० रुपये, गवार ३० ते ४० रुपये, कोबी १२ ते १६ रुपये, पालक ६ ते ७ रुपये, कोथिंबीर १६ ते २० रुपये, मेथी १६ ते २० रुपये, कांदापात १५ ते १६ रुपये, पुदिना ४ ते ५ रुपये आणि शेपू १० ते १५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याची माहिती बाजारातून देण्यात आली.







