अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा झालेल्या भीषण अपघातात एकूण २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी २४१ प्रवासी विमानात होते, तर अपघातग्रस्त परिसरातील २४ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विमानाने धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या १२ ते १५ सेकंदांत नियंत्रण सुटल्यामुळे भीषण दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. टेकऑफनंतर अवघ्या ५० सेकंदांत हे विमान कोसळल्याने प्रचंड हानी झाली.
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया अपघातात महाराष्ट्रातील १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह सहा क्रू मेंबर्स आणि चार प्रवाशांचा समावेश आहे. क्रू सदस्यांमध्ये सुमीत सभरवाल (मुंबई, पवई), दीपक पाठक (बदलापूर), मैथिली पाटील (न्हावा गाव, पनवेल), रोशनी सोनघरे (डोंबिवली), अपर्णा महाडिक (गोरेगाव), आणि साईनीता चक्रवर्ती (जुहू) यांचा समावेश आहे. प्रवाशांमध्ये मयूर पाटील, यशा कामदार (नागपूर), तसेच पंढरपूरचे रहिवासी आशा पवार आणि महादेव पवार हे दाम्पत्य यांचा समावेश आहे. मयूर पाटील यांची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. अहमदाबादमध्ये घडलेली एअर इंडिया विमान दुर्घटना ही भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात गंभीर घटना ठरू शकते. टेकऑफनंतर विमान आवश्यक उंचीवर न गेल्याचे लक्षात येताच, वैमानिक सुमीत सभरवाल यांनी हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राला ‘मे-डे कॉल’द्वारे तातडीचा संदेश दिला. मात्र, कोणतीही मदत मिळण्याआधीच अवघ्या ५० सेकंदांत या भीषण दुर्घटनेत २६५ जणांचे प्राण गेले. विमान का कोसळले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.







