पुणे : जिल्ह्यात मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बिबट्यांचे हल्ले रोखण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असून अतिसंवेदनशील भागात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’(एआय) प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन सर्वेक्षण करून बिबट्यांची संख्या नोंदविण्या येणार आहेत. दरम्यान, शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात आत्तापर्यंत १७ बिबट पकडण्यात आले असून हे सर्व बिबटे जुन्नर येथील ‘माणिकडोह बिबट निवारण केंद्रात’ ठेवण्यात आले आहेत. तसेच बिबट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे.
मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उपायोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. त्यामध्ये काही उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, प्रादेशिक आणि वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील घटनांचा आढावा घेण्यात आला. ग्रामसभा घेऊन नागरिकांना उपाययोजना, जिल्ह्यातील घटना आणि त्यावर सुरू असलेल्या कार्यवाहीबाबतची माहितीही देण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. ग्रामस्तरावर सहनियंत्रण समितीही स्थापन करून त्यामध्ये अनुभवी व्यक्ती, वन आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांचा समावेश करण्यात येणार आहे. या समितीमार्फत ड्रोन सर्वेक्षण करून गावात आढळणाऱ्या बिबट्यांची संख्या नोंदविली जाणार आहे.






