वृत्तसंस्था : कोरोनानंतर आता इबोला विषाणूमुळे जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आफ्रिकेतील काँगो, युगांडा आणि आसपासच्या देशांमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भारत सरकारही अलर्ट मोडवर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या परिस्थितीला “Public Health Emergency” घोषित केले असून भारतात अद्याप एकही पुष्टी झालेला रुग्ण आढळलेला नसला तरी केंद्र सरकारने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभावित आफ्रिकन देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवर विशेष वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. ताप, अशक्तपणा किंवा संशयास्पद लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तींना तात्काळ विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड, PPE किट, तपासणी सुविधा आणि निगराणी व्यवस्था सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. इबोला हा अत्यंत धोकादायक व्हायरल आजार मानला जातो. संक्रमित व्यक्तीच्या रक्त, शरीरातील द्रव किंवा दूषित वस्तूंमधून त्याचा प्रसार होऊ शकतो. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात, तर गंभीर अवस्थेत रक्तस्त्राव होण्याचाही धोका असतो. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी देशात सध्या इबोलाचा एकही पुष्टी झालेला रुग्ण नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेता सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या आणि आवश्यक उपाययोजना तत्काळ राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणते नियम पाळावे लागणार?
- आफ्रिकेतील प्रभावित देशांना अनावश्यक प्रवास टाळावा
- विमानतळांवर आरोग्य तपासणी अनिवार्य
- ताप, उलटी, जुलाब किंवा रक्तस्त्रावासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे
- संशयित रुग्णांच्या संपर्कात येणे टाळावे
- हात वारंवार धुणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे
- गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला
- सरकारच्या आरोग्य सूचनांचे काटेकोर पालन







