वृत्तसंस्था : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेला आजपासून सुरुवात होत असून पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सामन्याला प्रारंभ होणार असून ४ वाजता नाणेफेक होईल. या मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असून भारतीय संघातील युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे. विशेषतः अवघ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अपेक्षित कामगिरी करण्यात त्याला यश आले नव्हते. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत तो दमदार पुनरागमन करतो का, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार असून ही मालिका भारतासाठीही महत्त्वाची मानली जात आहे. सलग पराभवानंतर संघाला विजयाच्या मार्गावर परत आणण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.
या मालिकेत वैभव सूर्यवंशीकडे एक ऐतिहासिक विक्रम नोंदविण्याची संधी आहे. आतापर्यंत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ३७ सामन्यांत १३९ षटकार ठोकले आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने आणखी ११ षटकार लगावले, तर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांत १५० षटकार पूर्ण करणारा खेळाडू होण्याचा मान त्याला मिळू शकतो. त्यामुळे त्याच्या फलंदाजीकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे. दरम्यान, भारतीय संघ व्यवस्थापन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनीही वैभव सूर्यवंशीवर विश्वास व्यक्त केला असून, इंग्लंड मालिकेतील चुका सुधारून तो अधिक आत्मविश्वासाने खेळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हरारे येथील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत करणारी ठरण्याची शक्यता असून, या मालिकेत भारत युवा खेळाडूंना संधी देत विजयी सुरुवात करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.






