मुंबई : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात २९ महापालिकांपैकी बहुसंख्य महापलिकांत भाजप हा क्रमांक एक नंबरचा पक्ष ठरलाय. आता राज्यभरात महापौरपदाच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचदरम्यान राजकीय पक्षांनी जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू केली आहे. अजित पवार गटाने मुलाखती सुरू केल्या आहेत. त्याचदरम्यान एक मोठी बातमी हाती आली आहे. राज्यातील दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वातावरण तापले आहे. जिल्हा परिषद जिंकण्यासाठी आतापासूनच युती आणि आघाड्यांच्या राजकारणाने वेग पकडलाय. महापालिकेच्या निवडणुकानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनाचा महापौर व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय. याच दरम्यान दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी राजकारणात खळबळ उडवून दिलीय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा निर्माण झालीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूक जिंकण्यासाठी या एकत्रिकरणासाठी चर्चा चालू झालीय.







