मुंबई : वसई वसई-विरार महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने ‘एकल प्लास्टिक`विरोधातील मोहीम पुन्हा तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत प्रभाग समिती ‘जी`मधील एका व्यापारी गाळ्यावर छापा मारून चारशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. व्यापारी शैलेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुकदेव दरवेशी यांनी आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे व उपायुक्त चारुशीला पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली. महाराष्ट्र शासनाच्या २३ मार्च २०१८ रोजीच्या परिपत्रकानुसार, राज्यात एकल वापर प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली आहे. व्यापारी, दुकानदार, फेरीवाले यांना या बंदीबाबत कल्पना देऊन प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबात सूचना वसई-विरार शहर महापालिकेने केलेल्या आहेत. त्यानंतरही शहरातील व्यापारी, दुकानदार, फेरीवाले यांच्याकडे सर्रास प्लास्टिक पिशव्या व थर्माकोलची उत्पादने विक्रीसाठी अथवा वापर केला जात आहे.
याविरोधात महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग वेळोवेळी प्लास्टिक पिशव्या व थर्माकॉल उत्पादन जप्ती आणि दंडात्मक कारवाई करत असला तरी सातत्याने शहरातील व्यापारी, दुकानदार एकल प्लास्टिक पिशव्या वितरण आणि विक्री करत असल्याने तसेच फेरीवाले फळभाज्या विक्रीकरिता कमी जाडीच्या थैल्यांची विक्री करत असल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनतर्फे सांगण्यात आले. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलची उत्पादने यांची साठवणूक, विक्री व वापर करू नये. तसे आढळल्यास व्यापारी, दुकानदार व फेरीवाले यांच्याविरोधात अधिक तीव्र कारवाई करण्यात येईल, असा इशारा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपयुक्त चारुशीला पंडित यांनी दिला आहे.




