मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना भारत निवडणूक आयोगाने पक्षाच्या संविधानातील दुरुस्त्यांबाबत महत्त्वाचे पत्र पाठवले आहे. २७ जुलै २०२६ रोजी पाठविण्यात आलेल्या या पत्रात पक्षाच्या घटनेतील काही बदलांना मंजुरी देणारे ठराव आणि संबंधित कागदपत्रे आयोगाकडे सादर करण्यात आलेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ आवश्यक कागदपत्रे आणि वैध ठराव तातडीने सादर करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या संविधानात काही दुरुस्त्या करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. मात्र, आयोगाच्या छाननीत या बदलांशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले.
निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार, २६ फेब्रुवारीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावामध्ये केवळ कलम १८(१) मध्ये बदल करण्याचा उल्लेख आहे. मात्र, त्यानंतर आयोगाला पाठविण्यात आलेल्या पत्रांमध्ये कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मध्येही दुरुस्ती करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अतिरिक्त दुरुस्त्यांना मंजुरी देणारे अधिकृत ठराव किंवा त्यासंबंधीची कागदपत्रे आयोगाकडे उपलब्ध नसल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांनी १० मार्च २०२६ आणि ७ एप्रिल २०२६ रोजी आयोगाला पाठविलेल्या पत्रांमध्ये पक्षाच्या संविधानातील कलम ६, ७, १२, १८(१), ३२ आणि ३६ मध्ये बदल झाल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये केवळ कलम १८(१) संदर्भातील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावाचा समावेश असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. त्यामुळे उर्वरित कलमांमधील दुरुस्त्यांना मंजुरी देणारे ठराव, बैठकीची नोंद आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात पक्षाच्या संविधानातील कोणताही बदल अधिकृत ठराव आणि नियमांनुसार मंजूर झाल्याचे पुरावे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित कागदपत्रांशिवाय या दुरुस्त्यांची नोंद आयोगाच्या अभिलेखात स्वीकारता येणार नसल्याचेही आयोगाने नमूद केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोगाच्या पत्राला काय उत्तर दिले जाते, आवश्यक कागदपत्रे किती लवकर सादर केली जातात आणि त्यानंतर आयोग कोणती भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षाकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले जाणार का, याचीही उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. मात्र, २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांचे विमान बारामती विमानतळाजवळ अपघातग्रस्त झाले आणि त्यात त्यांचे निधन झाले. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक रचनेत आणि घटनेत करण्यात आलेल्या बदलांबाबतच आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण आणि आवश्यक कागदपत्रांची मागणी केली आहे.





