वसई : वसई-विरार महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष मोहीम राबवत सोमवारी शहरातील विविध भागांमध्ये मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ८८ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून संबंधितांकडून ₹१३ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या कमी जाडीच्या प्लास्टिकच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर शासनाने कायदेशीर बंदी घातली असतानाही शहरातील फेरीवाले, दुकानदार आणि विविध व्यावसायिक आस्थापनांकडून अशा प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जुलै रोजी शहरभर प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान सर्व प्रभाग समिती कार्यालयांच्या माध्यमातून दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि विविध व्यावसायिक परिसरांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत प्रभाग समिती ‘ए’ (बोळींज) अंतर्गत १० किलो, ‘बी’ (विरार) अंतर्गत ७ किलो, ‘सी’ (चंदनसार) अंतर्गत ६ किलो, ‘डी’ (आचोळे) अंतर्गत १० किलो, ‘ई’ (नालासोपारा) अंतर्गत १२ किलो, ‘एफ’ (पेल्हार) अंतर्गत १२ किलो, ‘जी’ अंतर्गत १० किलो, ‘एच’ अंतर्गत १५ किलो आणि ‘आय’ अंतर्गत ६ किलो असे एकूण ८८ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत ₹१३ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
महानगरपालिकेने नागरिक आणि व्यापाऱ्यांना प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापराबाबत पुन्हा एकदा इशारा दिला आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री किंवा वापर करताना आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाईसह कारावासाची शिक्षाही होऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी प्रतिबंधित प्लास्टिकची खरेदी-विक्री टाळावी तसेच नागरिकांनीही अशा प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करण्याची गरज असल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे. अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले की, शहरात प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री किंवा वापर करणाऱ्यांविरुद्ध महानगरपालिकेमार्फत नियमितपणे दंडात्मक कारवाई केली जात असून, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ही मोहीम पुढील काळातही अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे. शहरातील प्लास्टिकमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.






