नागपूर : “आजार कितीही गंभीर असला तरी केवळ पैशाअभावी कोणत्याही गरीब रुग्णाचे उपचार किंवा शस्त्रक्रिया थांबू नयेत, यासाठी राज्य शासनाने विविध आरोग्य योजनांद्वारे आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात आयोजित महाआरोग्य शिबिरात रविवारी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना व्हीलचेअरचे वितरण करण्यात आले. विविध सामाजिक संस्था आणि दात्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरसाठी आर्थिक मदत आणि रुग्णवाहिका प्रदान केल्या. या सर्व दात्यांचा तसेच महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचाव्यात, हा या महाआरोग्य शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने सर्वसामान्यांना उपचार सहज उपलब्ध व्हावेत यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, सरकारी रुग्णालयांची संख्या वाढविण्याबरोबरच महात्मा फुले जनआरोग्य योजनेत यापूर्वी समाविष्ट नसलेल्या अनेक गंभीर आजारांचाही समावेश करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या दीड वर्षांत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामार्फत ५७ हजार रुग्णांना उपचारांसाठी तब्बल ४५२ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, धर्मादाय रुग्णालयांमधील गरजू रुग्णांसाठी राखीव खाटांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी डिजिटल व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. काही गंभीर आजारांचे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या ५ लाख रुपयांच्या मर्यादेत शक्य नसल्याने अशा रुग्णांसाठी शासनाने विशेष धोरण आखले आहे. त्यानुसार काही आजारांसाठी ९ लाख रुपयांपर्यंत, तर अत्यंत गंभीर आजारांच्या उपचारांसाठी ३५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ऐकू न आल्यामुळे बोलता न येणाऱ्या लहान मुलांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या उपक्रमामुळे अनेक मुलांना ऐकण्याबरोबरच बोलण्याची क्षमता प्राप्त होणार असून, भविष्यात मूकबधिर मुलांची संख्या कमी करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांग बांधवांसाठी ९ ऑगस्ट रोजी कृत्रिम पाय आणि कृत्रिम हातांचे वितरण करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा, आधुनिक उपचार आणि आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून निरोगी समाज घडविण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अजित गोपचडे, आमदार प्रवीण दटके, संजय भेंडे, मोहन मते, राजीव पोतदार, महापौर नीता ठाकरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.






