मुंबई : यंदाच्या आषाढी वारीत राज्य शासनाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाने लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची प्रभावी काळजी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा समारोप शुक्रवार, २४ जुलै रोजी होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा लाभ राज्यातील १४ जिल्ह्यांतील तब्बल ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला. आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पायी प्रवास करावा लागत असल्याने स्नायूदुखी, पायांना फोड येणे, शारीरिक थकवा तसेच पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना तातडीची व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मागील वर्षी सात जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा यंदा विस्तार करून सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, सांगली, अमरावती आणि अहिल्यानगर या १४ जिल्ह्यांतील दिंडी मार्गावरील १४० मुक्कामस्थळांवर सेवा केंद्रे उभारण्यात आली. या केंद्रांमधून वारकऱ्यांना चरणसेवा, मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, प्रथमोपचार, आवश्यक औषधांचे वितरण, रुग्णवाहिका सुविधा तसेच गरजेनुसार पुढील उपचारांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे वारीदरम्यान उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक अडचणींवर त्वरित उपचार मिळाल्याने वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
या उपक्रमाच्या यशामध्ये विविध आरोग्य संस्था, डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांचा मोठा वाटा राहिला. एकूण १६४ आरोग्य संस्थांनी या सेवाकार्यात सहभाग नोंदविला. त्याचबरोबर ७ हजार ५३८ स्वयंसेवक तसेच ११ हजार ३३१ डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी योगदान दिले. चरणसेवेसाठी ३ हजार लिटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा वापर करण्यात आला, तर सेवाकार्यात सहभागी स्वयंसेवकांसाठी १० हजार टी-शर्ट उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, संसर्गजन्य आजारांपासून बचाव, रक्तदान, अवयवदान, निरोगी जीवनशैली तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. उपचारांबरोबरच आरोग्यविषयक जनजागृतीलाही या उपक्रमात तितकेच महत्त्व देण्यात आले. लोकसहभागातून साकारलेल्या या उपक्रमामुळे तब्बल ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांना प्रत्यक्ष चरणसेवा आणि आरोग्यसेवा उपलब्ध झाली. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ‘चरणसेवा’ पोहोचविण्यात यश आल्याचा आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला विविध आरोग्य संस्था, दानशूर व्यक्ती, डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि हजारो स्वयंसेवकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून लोकसहभाग हीच या सेवाकार्याची सर्वात मोठी ताकद ठरली.






