मुंबई : शासकीय कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड तंत्रज्ञान आणि डेटा सेंटरचा प्रभावी वापर करण्यावर राज्य शासन भर देत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत महाराष्ट्राला एआयच्या वापरात देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने मंत्रालयात सुरू करण्यात आलेल्या ‘टेक थर्सडे’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. इलेक्ट्रॉनिक्स,माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागा मार्फत ‘टेक थर्सडे’उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी मुख्य सचिव राजेश अग्रवाल बोलत होते. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, आयुक्त एस.भुवनेश्वरी विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधानसचिव व सचिव,शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले की, देशातील सुमारे ५० ते ६० टक्के डेटा सेंटर क्षमता आणि एआय पायाभूत सुविधा महाराष्ट्रात असून हे नेतृत्व कायम राखण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पर्यावरणपूरक ग्रीन डेटा सेंटर उभारणीसाठी अक्षय ऊर्जेचा वापर, तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराला प्राधान्य दिले जात आहे. शासकीय माहितीची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ‘महा एआय’ आणि ‘सर्वम’ यासारखी एआय मॉडेल्स राज्याच्या स्वतःच्या सर्व्हर आणि जीपीयू पायाभूत सुविधांवर कार्यरत असल्याने संवेदनशील शासकीय माहिती बाह्य क्लाउड किंवा परदेशी सर्व्हरवर जाणार नाही. कृषी क्षेत्रात अॅग्री स्टॅकच्या माध्यमातून एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत एआय-आधारित व्हॉईस बॉटद्वारे मार्गदर्शन पोहोचविण्यात येत असून नंदुरबारसारख्या भागातील शेतकऱ्यांनाही भिली भाषेत सल्ला उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना मसुदा तयार करणे, शासन निर्णय शोधणे आणि विधिमंडळ प्रश्नांची उत्तरे तयार करण्यासाठी एआय-आधारित सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या सर्व्हर आणि जीपीयूच्या आधारे विकसित केलेले ‘महा-एआय’ हे संपूर्णपणे सुरक्षित आणि स्वायत्त व्यासपीठ आहे. भविष्यातील ‘एजंटिक एआय’ नागरिकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल. नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी अर्ज भरणे, डिजीलॉकरमधून आवश्यक कागदपत्रे मिळविणे किंवा विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी केवळ एआयशी संवाद साधावा लागेल. त्यानंतर अर्ज भरण्यापासून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यापर्यंतची सर्व कामे ‘एआय’ स्वतःहून करेल. याशिवाय वीजबिल भरणे, सर्वात स्वस्त प्रवास तिकीट शोधून बुक करणे, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये टेबल आरक्षित करणे, ई-मेलला उत्तर देणे यांसारखी अनेक दैनंदिन कामेही एजंटिक एआयच्या माध्यमातून स्वयंचलितपणे पार पडतील, असे त्यांनी स्पष्ट केले.






