नवी दिल्ली : देशातील तरुणांचे हित आणि त्यांच्या भवितव्याला केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असून, पेपरफुटी प्रकरणातील एकाही दोषीला सोडले जाणार नाही, असा ठाम संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. सोशल मीडिया मंच ‘एक्स’वरील पोस्टद्वारे त्यांनी सांगितले की, पेपरफुटीशी संबंधित सर्व प्रकरणांतील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले चालविण्याची तरतूद करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आवश्यक निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले असून, तातडीने कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून सातत्याने निर्णय घेतले जात असून, भविष्यातही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका कायम राहील, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कायद्यापासून सूट दिली जाणार नाही, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
दरम्यान, पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सोमवारी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर या आंदोलनाला अधिक धार मिळाली असून, विविध स्तरांतून सरकारवर टीका करण्यात आली आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले, तर या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे पुन्हा अधोरेखित करत, पेपरफुटी प्रकरणातील दोषींविरुद्ध जलदगतीने आणि कठोर कारवाई केली जाईल, तसेच फास्ट ट्रॅक न्यायालयांद्वारे खटले चालवून न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
CJP आंदोलकांच्या चार प्रमुख मागण्या काय?
१) सोनम वांगचुक यांची सुटका करा
२) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या
३) आत्महत्या केलेल्यांच्या विद्यार्थी कुटुंबांना १ कोटींची भरपाई द्या
४) २० जुलैच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शांततापूर्ण आंदोलकांवरील कायदेशीर कारवाई मागे घ्या
या चार प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आग्रही आहेत. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका अभिजीत दिपकेंनी घेतली आहे.






