मुंबई : मुंबईत पात्र फेरीवाल्यांना ‘क्यूआर’ कोड देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईही मुंबई महापालिकेने अधिक तीव्र केली आहे. जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने ५५ हजार ८६१ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत ७५ लाख १५ हजार २६० रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय, खाद्यपदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीरपणे वापरले जाणारे ६७८ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. रस्ते आणि पदपथांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा प्रश्नही अधिक गंभीर होत आहे. महापालिका सातत्याने कारवाई करत असली तरी कारवाईनंतर काही दिवसांतच अनेक ठिकाणी पुन्हा अनधिकृत फेरीवाले व्यवसाय सुरू करत असल्याने रस्ते आणि पदपथ कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त कधी होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केंद्र सरकारने २०१४ मध्ये फेरीवाला धोरण जाहीर केले असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी मुंबईत अद्याप पूर्णपणे झालेली नाही. त्यामुळे पात्र आणि अपात्र फेरीवाल्यांचा प्रश्न कायम आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील १३ विभागांतील २० संवेदनशील ठिकाणी विशेष मोहीम राबवून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा उद्देश महत्त्वाचे रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करून नागरिकांना सुरक्षित आणि मोकळी पादचारी सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, महापौर रितू तावडे यांच्या ‘एन’ वॉर्डमध्ये (घाटकोपर-विद्याविहार) सर्वाधिक कारवाई करण्यात आली. घाटकोपर पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानक परिसरासह या विभागात ४ हजार ६७४ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६ लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय, खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांकडून ३३ अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. घाटकोपर परिसर हा शहरातील सर्वाधिक गर्दीचा भाग असल्याने येथे पदपथांवरील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. दरम्यान, पात्र फेरीवाल्यांना ‘क्यूआर’ कोड देण्याच्या प्रक्रियेमुळे अधिकृत फेरीवाल्यांची ओळख निश्चित होणार असून, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पादचाऱ्यांना अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाईबरोबरच आवश्यकतेनुसार साहित्य जप्त करण्याची मोहीमही कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
कारवाई झालेल्या फेरीवाल्यांची संख्या :
एन वॉर्ड (घाटकोपर-विद्याविहार) : ४,६७४
पी दक्षिण (गोरेगाव) : ४,००३
ए (कुलाबा, फोर्ट, नरीमन पॉइंट) : ३,८६२
डी (ग्रॅण्ट रोड, मलबार हिल. गिरगाव) : ३,२७२
जी दक्षिण (वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, करी रोड) : ३,४०७
आर मध्य (बोरिवली) : ३,९३७
एकूण : ५५,८६१






