मुंबई : राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या रक्तपेढ्यांपैकी एक असलेल्या जे. जे. महानगर रक्तपेढीचे कामकाज अन्न व औषध प्रशासनाने सुरक्षेतील गंभीर त्रुटींमुळे तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने जून महिन्यात केलेल्या संयुक्त तपासणीत रक्तसंकलन, रक्तसाठवण, गुणवत्ता नियंत्रण, रक्तघटक निर्मिती, उपकरणांची देखभाल तसेच जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनामध्ये गंभीर नियमभंग आढळून आला. तपासणीदरम्यान रक्तपिशव्यांची अयोग्य विल्हेवाट, दोषपूर्ण उपकरणे, प्रशिक्षित तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता, गुणवत्ता चाचण्यांतील त्रुटी आणि जैववैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनातील हलगर्जीपणा यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष नोंदविण्यात आला. या पार्श्वभूमीवर कोणतीही जोखीम न पत्करता रक्तपेढीचे कामकाज तात्काळ बंद करण्यात आले असून संबंधित संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सर्व त्रुटी दूर झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांमुळे रक्ताची मागणी वाढत असताना राज्यातील प्रमुख रक्तपेढी बंद झाल्याने रक्तपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच प्रकरणात जे. जे. महानगर रक्तपेढीतून उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयासाठी पाठविण्यात आलेल्या सहा रक्तपिशव्या प्रत्यक्षात रुग्णालयात पोहोचल्याच नसल्याचा आरोपही करण्यात आला असून त्या नेमक्या कुठे गेल्या याबाबत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या आरोपांची दखल घेत राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सुरक्षित रक्तपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गुणवत्ता, पारदर्शकता आणि सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. या कारवाईमुळे राज्यातील इतर रक्तपेढ्यांनाही गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या निकषांचे काटेकोर पालन करण्याचा स्पष्ट संदेश मिळाल्याचे मानले जात आहे.







