रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध भागांतून लाखो शिवप्रेमी, शिवभक्त आणि इतिहासप्रेमींनी गडावर हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच महादरवाजा, होळीचा माळ, राजसभा आणि श्री जगदीश्वर मंदिर परिसरात शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण रायगड किल्ला भगव्या पताका, आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आला असून पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, लेझीम, रणशिंगांचा निनाद आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडत असून विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि हजारो शिवभक्त या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्रांच्या मंगलमय वातावरणात राजसिंहासनाचे पूजन, जलाभिषेक आणि पारंपरिक धार्मिक विधी पार पडत असून मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून वाहतूक, आरोग्य, आपत्कालीन सेवा आणि गर्दी नियोजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भर पावसातही शिवभक्तांचा उत्साह कायम असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विचारांना अभिवादन करणारा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा गौरव करणारा हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होत आहे.







