नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येत्या सोमवारपासून (२५ मे) अधिकृतपणे १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. वाढते तापमान, वेगाने होणारे बाष्पीभवन तसेच ‘एल-निनो’ आणि ‘आयओडी’च्या प्रभावामुळे शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या मोरबे धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. भविष्यात संभाव्य तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पालिका क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, मोरबे धरणाची एकूण साठवण क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मात्र, सध्या धरणात केवळ ३६.४७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच अवघा १९.११ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित राखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कपात लागू करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पावसाचे आगमन आणि धरणातील पाणीसाठा यावर पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होईपर्यंत ही पाणी कपात कायम राहण्याची शक्यता आहे.







