नवी दिल्ली : बटाटा चिप्स, बिस्किटे, नमकीन, शीतपेये आणि आईस्क्रीमसारखे पॅकबंद पदार्थ खरेदी करताना बहुतांश ग्राहक त्यांच्या घटकांवरील माहिती वाचत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे ही माहिती पाकिटाच्या मागील बाजूस अत्यंत बारीक अक्षरात दिलेली असते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना त्यातील साखर, मीठ, फॅट्स किंवा इतर घटकांची माहिती समजणे कठीण जाते. मात्र, आता ही पद्धत बदलण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या अधिकाराचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (FSSAI) खाद्यपदार्थांच्या पाकिटाच्या समोरील भागावर स्पष्ट चेतावणी लेबल लावण्याबाबत निर्देश दिले आहेत. यामुळे ग्राहकांना कोणत्या पदार्थात जास्त साखर, मीठ किंवा हानिकारक फॅट्स आहेत, हे एका नजरेत समजणार आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भारतात या नियमांची अत्यंत गरज आहे. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांमध्ये सातत्याने वाढ होत असून लहान मुलांपासून तरुणांपर्यंत अनेकजण त्याच्या विळख्यात सापडत आहेत. बाजारात उपलब्ध असलेले अनेक पॅकबंद पदार्थ हे अति-प्रक्रिया केलेले प्रॉडक्ट्स असून त्यामध्ये चव वाढवण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकवण्यासाठी अतिरिक्त साखर, मीठ आणि अस्वास्थ्यकारक फॅट्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये ‘फ्रंट ऑफ पॅक’ चेतावणी प्रणाली आधीपासून लागू आहे आणि त्याचा सकारात्मक परिणामही दिसून आला आहे. भारतातही पारंपरिक व सकस आहाराऐवजी झटपट मिळणाऱ्या पॅकबंद पदार्थांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.







